कोरोना ः परदेशातून आलेल्या त्रेपन्न जणांचे अहवाल निगेटिव्ह

Latur Updates
Latur Updates

लातूर ः लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या परदेशातून आलेल्या व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ता.१ ते २३ मार्च या कालावधीत लातूर जिल्ह्यात ५३ व्यक्ती परदेशातून आल्या होत्या. या सर्वच्या सर्व व्यक्तींचे कोरोना संबंधीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या तरी या सर्वांची प्रकृती चांगली आहे.


वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी (ता.३०) जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आढावा घेतला आहे. त्यात ता.१ ते २३ मार्च या कालावधीत परदेश प्रवास करून आलेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या करोना तपासणीच्या कामाची माहितीही त्यांनी घेतली आहे. लातूर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना संबंधी तपासणी करण्याच्या सूचना काही दिवसापूर्वीच पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. यातून ही माहिती समोर आली आहे.


लातूर जिल्ह्यात ता. १ ते २३ मार्च या कालावधीत परदेशातून लातूर ग्रामीणमध्ये ५, लातूर शहरात २१, औसा १, निलंगा ९, उदगीर ९, चाकूर ४, शिरूर अनंतपाळ १, अहमदपूर तालुक्यात ३ व्यक्ती आल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांचे कोरोना संदर्भातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सतर्कता बाळगावी. वेगवेगळ्या उपाय योजना तातडीने राबवव्यात असे आदेशही श्री. देशमुख यांनी प्रशासनाला आहेत. परदेश प्रवास करून आलेल्या जिल्ह्यातील या व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती चांगली आहे. शासनाचा आरोग्य विभाग, आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय आरोग्य संस्था यांच्यामार्फत परदेशवारी करून आलेल्या आणखी नागरिकांचा शोध घेतला जात आहे. सर्वांवर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी दोन कोटींचा निधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तातडीने निर्माण करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनूसार आपत्कालीन आकस्मिक निधीमधून दोन कोटी १७ लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याची लागण झाल्यास रुग्णावर उपचार करण्यासाठी म्हणून तातडीने सोयीसुविधा उभारण्यात येत आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा म्हणून शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत युद्धपातळीवर उपाययोजना आखण्यात येत आहेत. या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडणार नाही, असे श्री. देशमुख यांनी जाहीर केले. त्यानुसार या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सोयीसुविधांसाठी दोन कोटी १७ लाख खर्चासाठी आकस्मिक निधीतून मंजुरी देण्यात आली आहे.


या निधीमधून कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारणे, तात्पुरती निवास व्यवस्था तयार करणे, रुग्णांसाठी अन्न-कपडे यांची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे त्याचबरोबर या आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे यावर हा निधी खर्च होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत हा खर्च होणार आहे. त्यामुळे निधी नाही म्हणून रुग्णांसाठी सुविधा नाहीत, असे चित्र निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com