कापूस-तूर खरेदीला फटका !

file photo
file photo

परभणी : जमावबंदी आदेशासह सर्व अस्थापना बंदचे आदेश असल्याने येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबल्याने अखेरच्या टप्यातील तूर-कापूस खरेदीला फटका बसला आहे.अजुनही १० ते १५ टक्के शेतकऱ्यांकडे कापूस आणि तूर बाजार शिल्लक आहे. दरम्यान, येथील मोंढ्यात देखील शुकशुकाट पसरला आहे.
‘कोरोना’ विषाणुमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक शासकीय कार्यालयात देखील प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच सर्व खासगी अस्थापना, कार्यालये बंद झाली आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेदेखील बंद आहेत. त्यामध्ये बाजार समितीमधील व्यवहारदेखील बंद झाले आहेत. जिल्ह्यात नाफेड, सिसीआय आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी कापूस खरेदीदेखील बंद करण्यात आली आहे.


‘कोरोना’ च्या संकटाने खरेदी बंद
परभणी जिल्ह्यात १९ लाख ६१ हजार १४०.०५ क्विंटल अशी कापूस खरेदी झाली आहे. त्यामध्ये राज्य कापुस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडून १३ केंद्रावर आतापर्यंत ५ लाख ३५ हजार ३५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. भारतीय कापुस निगम महामंडळ अर्थात सिसीआयच्या परभणी जिल्ह्यातील सेलु, मानवत, पूर्णा, ताडकळस, जिंतूर, सोनपेठ येथील सात केंद्र अंतर्गत ८ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल परभणी जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्यांनी पाच लाख ९३ हजार ९८३ क्विंटल कापूस खरेदी केली आहे. त्यानंतर आलेला पाऊस आणि ‘कोरोना’चे संकट यामुळे खरेदी बंद करण्यात आली आहे. अजुनही १० ते १५ शेतकऱ्यांकडे कापुस शिल्लक असल्याची माहिती आहे. तसेच तुरीचीदेखील खरेदी बंद असल्याने  ५० टक्के शेतकऱ्यांकडे तुर शिल्लक आहे.

हातावर पोट असणाऱ्यांचे हाल
 परभणीसह सर्व बाजार समित्याअंतर्गत खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
नेहमी गजबजणाऱ्या सर्वच मोंढ्यात सध्या केवळ शुकशुकाट पाहयला मिळत आहे. मोंढ्यातील शुकशुकाटामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल सुरु झाले आहेत. हमाल-मापाडी, गाडीवाले यांच्या रोजगारावर गदा आली असल्याने या वर्गाला मोठा फटका बसत आहे.

भाजीपाला विक्री सुरु
भाजीपाला, दुध हे जिवनावश्यकमध्ये गणल्या जात असल्याने पाथरी रस्त्यावरील भाजीपाला मार्केट सुरु आहे. शेतकरीदेखील मोठ्या संख्येने शहरात भाजीपाला आणत आहेत.


...आगामी खरिप हंगामावर परिणाम
‘कोरोना’ला हरवायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक आहे. मात्र, त्याचे  परिणाम दिर्घकालीन असून आगामी खरिप हंगामावर देखील होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेतमालाची विक्री झालेला नाही, तसेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी थांबलेली आहे. त्यासोबतच अनेक कंपन्यांची बिजोत्पादनाची कामे ठप्प झाल्याने आगामी खरिप हंगामावर देखील परिणाम होणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com