शिवना (जि.औरंगाबाद): आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शिवना (ता. सिल्लोड) परिसरातील काढणीला आलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात "सकाळ'ने शनिवारी (ता. 27) प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे कृषी विभाग, विमा कंपन्यांच्या व्यवस्थापनात खळबळ उडाली. यानिमित्ताने त्यांच्यात कसे साटेलोटे आहे, हेही समोर आले.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी कृषी विभागाने पीकविमा कंपनीच्या हातात हात घालून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. या पत्रात शेतकऱ्यांना अवघ्या 48 तासांची मुदत दिली. या भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न व सर्व्हर डाऊनचा प्रश्न पाहता शेतकऱ्यांना दोन महिन्यांची वाढीव मुदतही पुरणार नाही. कारण, ऑफलाइन अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन माहिती दोन दिवसांत शासनाकडे कशी पोचविली जाईल, हा प्रश्नच आहे. कृषी विभागाने या पत्राद्वारे काढलेल्या फतव्याची मुदत दीपावलीच्या दिवशी संपली. अधिकारी वर्ग सुटीवर आहे. त्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोबाईल बंद येत असल्याने अडचण
कृषी विभागाने शुक्रवारी (ता.26) जारी केलेल्या पत्रात ज्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे तो बंद येत आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांचाही मोबाईल बंद येत असल्याने शेतकऱ्यांना काय करावे, हे समजेनासे झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.