समुहशेती राबविणारे धनगरवाडी ठरतेय आदर्श गाव   

reshim sheti
reshim sheti

नांदेड : शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले असतानाच लहानशा गावातील एखाद्या शेतकऱ्याने समुह गटाच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न मिळविले असेल तर त्या शेतकऱ्याकडे बघुन इतर शेतकऱ्यांना शेती करण्याचे बळ मिळते. अगदी असेच बळ धनगरवाडीतील शेतकऱ्यांना मिळत आहे. काही वर्षापूर्वी धनगर वाडीतील पाच ते सहा शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून तुतीची लागवड करून कोश निर्मितीतुन लाखो रूपयांचे उत्पन्न मिळविले होते. आजघडीला धनगरवाडीतील जवळपास ६१ शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेतीच्या माध्यमातून एका वर्षात ८७ लाख रूपये इतके उत्पन्न घेतले आहे.


शहरापासून जवळ असलेल्या धनगरवाडी येथील ६१ शेतकरी मिळुन गटशेतीच्या माध्यमातुन ७४ एकरावर तुतीची लागवड करत आहेत. यातुन त्यांना चांगले उत्पन्न मिळत असून, एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात शेतकऱ्यांनी ७४ एकरात तुतुची लागवड करून त्यातुन ८७ लाख ३६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यासाठी रेशीम विभागाकडून ६१ शेतकऱ्यांना ४१ हजार ३५० अंडीपुंजीचे वाटप करण्यात आले होते. यातुन धनगरवाडीच्या शेतकऱ्यांनी २४ टन ९०० किलो इतके कोष उत्पन्न मिळविले होते. सध्या कोशाला चांगला भाव मिळत असल्याने त्यातुन शेतकऱ्यांना ८७ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

१४ टन कोशाची निर्मिती
चालु आर्थिक वर्षात पाऊस उशिरा सुरू झाला आणि उशिरा संपल्याने किमान चार महिण्यांचा अवधी वाया गेला. तरीदेखिल धनगरवाडीच्या शेतकऱ्यांना यंदा सुद्धा मागील वर्षापेक्षा चांगले उत्पन्न मिळण्याची आशा असून, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर अखेरपर्यंत २३ हजार अंडी पुंजीतुन १४ टन कोशाचे निर्मितीतुन ४० लाख ७५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

रेशीम शेतीत जिल्हा चौथ्या स्थानावर
नांदेड जिल्ह्यात अवघ्या काही गावातच रेशीम शेती केली जात असली तरी, यातुन उत्पन्न मिळविण्यात नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात चौथ्या क्रमांकावर आहे. रेशीम उत्पादनात सध्या बीड, जालना, औरंगाबाद ही अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर असून, नांदेड जिल्हा चौथ्या स्थानी आहे.

जिल्ह्यातील ७९१ शेतकरी करतात रेशीम शेती
सध्या जिल्ह्यातील ७९१ शेतकरी मिळुन ९६५ एकरावर रेशीम शेती करत आहेत. २०१८-१९ मध्ये दोन लाख ६४ हजार १७२ अंडी पुंजितुन शेतकऱ्यांनी १५७ मेट्रीक टन २०० किलोग्राम रेशीम कोशाचे उत्पन्न मिळवले होते. त्यातुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी २४ लाख ७८ हजार रूपये इतके उत्पन्न मिळाले आहे. या शिवाय रेशीम शेतीमध्ये गुंतलेल्या कुशल व अकुशल शेतकऱ्यांना मनरेगा योजनेंतर्गत एक कोटी ८९ लाख ५४ हजार रुपये इतका लाभ मिळाला आहे.

भविष्यात रेशीम शेती करण्याकडे वळावे
जिल्ह्यात लवकरच महा रेशीम शेती अभियान सुरू होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि रेशीम शेती समजुन घेऊन गटशेतीच्या माध्यमातून भविष्यात रेशीम शेती करण्याकडे वळावे असे झाल्यास नांदेड जिल्हा हा रेशीम शेतीमध्ये मराठवाड्यात अव्वल असेल. - श्रीमती ए. व्ही. वाकुरे, रेशीम विकास अधिकारी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com