
कळमनुरी ः कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून सोमवारी (ता. १६) भरण्यात येणारा आठवडे बाजार रद्द केल्यामुळे आठवडे बाजारात सर्वत्र शुकशुकाट होता. या प्रकाराची कल्पना नसलेल्या बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली. त्यांनी विक्रीकरिता आणलेला भाजीपाला कवडीमोल भावात स्थानिक विक्रेत्यांना विक्री करावा लागला.
कोरोना विषाणुजन्य संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. याकरिता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानेही शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक उपाययोजना म्हणून सोमवारी भरणारे आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत भरविण्यात येणार नसल्याचे रविवारी (ता.१५) उशिराने घोषित केले. तशा आशयाचे निवेदन शहरातून करण्यात आले. त्यानंतरही पालिका प्रशासनाने सोमवारी आठवडे बाजार भरणाऱ्या ठिकाणी पालिका कर्मचारी मोहम्मद जाकीर, मनोज न कवाल, मोहम्मद नदीम, राजू साळवे ,मोहनीश वाढवे, श्री. अलीम यांची आठवडे बाजारात नियुक्ती करून या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीची दुकाने थाटण्यास प्रतिबंध करण्यात आला. या वेळी पोलिस प्रशासनानेही आपले दोन कर्मचारी नियुक्त केले.
आठवडे बाजार भरणार नसल्याची कल्पना नव्हती
आठवडे बाजार भरणार नाही, या प्रकाराची कल्पना नसलेल्या बाहेरगावांहून आलेल्या भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी भाजीपाला सोबत घेऊन कळमनुरी गाठली. मात्र, आठवडे बाजार परिसरात भाजीपाला विक्रीचे दुकाने थाटण्यास प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचे काय करायचे, या विवंचनेत सापडलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना नाशवंत भाजीपाला मिळेल त्या किमतीत स्थानिक विक्रेत्यांना कवडीमोल भावाने विकावा लागला.
ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्थेला फटका
काही शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला स्थानिक नागरिकांना वाटप करीत काढता पाय घेतला. एकंदरीत आठवडे बाजार भरणार नसल्याची कल्पना नसलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याच्या वाहतुकीचा खर्चही निघाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोरोना संसर्ग विषाणुजन्य आजाराचा फटका आता ग्रामीण भागामधील ही अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे.
वाहतुकीचा खर्चही निघाला नाही
आठवडे बाजारासाठी शेतामधून टोमॉटो, मिरची व मेथीची भाजी मजूर लावून तोडून विक्रीसाठी आणली. मात्र, या ठिकाणी आठवडे बाजारच भरला नाही. त्यामुळे २५ किलो टोमॅटो असलेली कॅरेट चाळीस रूपयाला विक्री केले तर चाळीस किलो मेथीची भाजी दोनशे रुपयाला विकली. मिरची ही कवडीमोल भावाने स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतली. यामध्ये वाहतुकीचा खर्चही निघाला नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. - विलास भोयर, शेतकरी, हातमाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.