देगलूर (जि. नांदेड) - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नक्षलवादी होण्याची अनुमती द्या, अशी मागणी नांदेडमधील तरुण शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. देगलूर, मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा व दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही शासनाकडून कुठलीही ठोस पावले उचलली गेले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांच्यामार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, उंबरठा उत्पन्नाची जाचक अट तत्काळ रद्द करून खरीप 2018 चा पीकविमा मंजूर करावा, दुष्काळ मदतनिधी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा, चारा छावण्या सुरू करण्यास असमर्थ ठरलेल्या शासनाने अनुदानाची रक्कम पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करावे, चुकीच्या शेती धोरणांमुळे सध्या शेती परवडत नसल्यामुळे अफू व गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी आदी प्रमुख मागण्या केल्या आहेत.
|