
देवगावफाटा : गेल्या पाच-सहा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा अशा या हवामान बदलाचा रब्बी पिकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे खरीपापाठोपाठ रबी हंगामही वाया जातो की काय, अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यावर्षी सुरवातीला परिसरातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाशी मोठा सामना करावा लागला. आपल्या शेतीच्या भरवशावर अनेक स्वप्ने ऊराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पीके ऐन खुडणी, कापणीच्या अवस्थेत असतांनाच पावसाने थैमान घालून होत्याचे नव्हते केले आणि शेतकऱ्यांचे स्वप्न स्वप्नच राहीले. या संकटातून सावरून शेतकरीवर्गाने उधार-ऊसणवारी करीत रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडाई या पिकांची पेरणी केली. पिकाची वाढ होत असतानाच आता पुन्हा या पिकांना ढगाळ हवामान, पहाटचे दाट धुके व दव बिंदू यांची नजर लागली आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
या पिकावर आता मर, करपा, मावा,अळी या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रबी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात गहू, हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते, परंतु डिसेंबर महिनाभरात संपत आला तरी थंडी अद्याप गायब असल्याने पुन्हा पिकावर याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
महागड्या औषधांची फवारणी...
हवामान खात्यानेही पावसाचा व तसेच गारपीटीचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली असून, त्यांच्या डोक्यात चिंतेचे ढग घोंघावत आहेत. वातावरणातील बदलाने रबी हंगामातील सर्वच पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र, तरी देखील सध्याच्या या वातावरणामुळे रबी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरीवर्गात धास्ती निर्माण झाली आहे.
हेही वाचा...सुटीच्या पगाराचं हे गुरुजी काय करतात? वाचा-
कार्यालयात बसूनच केले जातेय मार्गदर्शन...?
एकीकडे सततच्या वातावरणातील बदलामुळे रबीची पिके धोक्यात आली असून, पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही रोगावर नियंत्रण येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र, सेलू तालुका कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे धडे देत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.