आनंदवार्ता : अखेर जलकुंभात आले पाणी

जलकुंभात पाणी सोडण्याचे बटण दाबताना उपमहापौर वाघमारे व अन्य.
जलकुंभात पाणी सोडण्याचे बटण दाबताना उपमहापौर वाघमारे व अन्य.

परभणी : महापालिका प्रशासनाची इच्छाशक्ती व अभियंते, तांत्रिक कामगाराच्या प्रचंड मेहनतीमुळे अखेर अमृत योजनेंतर्गत धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून सोडलेले शुद्ध पाणी परभणी येथील मुख्य साठवण जलकुंभात मंगळवारी (ता. ३१) पोचले. तांत्रिक दोष युद्धपातळीवर पूर्ण केल्यामुळे केल्यामुळे दोन दिवस अगोदरच पाणी आणण्यास यंत्रणेला यश मिळाले आहे.

या वेळी माजी नगरसेवक रवींद्र सोनकांबळे, शहरअभियंता वसीम पठाण, कंत्राटदार श्री. मुंढे, शाखा अभियंता इस्माईल शेख, प्रसिद्धी विभाग प्रमुख राजू जाधव आदींची उपस्थिती होती. तत्कालीन नगरपालिकेला १९९६ मध्ये ‘यूआयडीएसएसएमटी’अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु, प्रत्यक्ष या योजनेच्या कामास २००३ मध्ये काही प्रमाणात सुरवात झाली होती. त्यानंतर ही योजना प्रचंड रखडली. दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा जुन्याच योजनेवर अवलंबून होता. तसेच अंतर्गत वितरण व्यवस्था फक्त अर्ध्या भागातच असल्यामुळे अर्धे शहर बोअरवेल किंवा हातपंपांच्या पाण्यावरच अवलंबून होते. उन्हाळ्यात बोअरवेल व हातपंप आटत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असे. असे वर्षानुवर्षांपासून चालू होते. 

२०१२ पासून योजनेला गती
त्यानंतर २०१२ पासून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या योजनेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. येलदरी येथे जॅकवेल, बीपीटी आदी कामे सुरू झाली. तसेच येलदरी ते धर्मापुरी या मार्गावर मोठ्या जलवाहिन्या अंथरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. एकीकडे निधीची वाणवा, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा प्रश्न गंभीर झाला होता. योजना पूर्ण होते की नाही, अशी परिस्थिती होती. परंतु, त्याच दरम्यान अमृत योजना शहरासाठी मंजूर झाली आणि या योजनेला नवसंजीवनी मिळाली. २०१६ मध्ये जलशुद्धीकरण केंद्रासाठी धर्मापुरी येथे महापालिकेने जागा खरेदी केली व या दोन्ही योजनेतून शहराला पाणीपुरवठा होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम युद्धपातळीवर पूर्ण
धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम विहित वेळेत युद्धपातळीवर पूर्ण झाले. त्यासाठी संबंधित कंत्राटदार, शासन व प्रशासन निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. अनेक अडथळे त्यांनी अतिशय प्रयत्नाने बाजूला केले व अखेर हे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाले. गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून येलदरी ते धर्मापुरी पाण्याच्या चाचण्या घेतल्या जात होत्या. त्या यशस्वी झाल्यानंतर ‘एक्सप्रेस फीडर’चे काम पूर्ण करण्यात येऊन धर्मापुरी ते परभणी चाचण्या घेण्याचे सुरू झाले होते. अखेर धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे परभणी शहरातील विद्यानगर येथे असलेल्या मुख्य साठवण जलकुंभापर्यंत पोचले.

 


प्रत्येक जलकुंभांची होणार क्षमता चाचणी
शहरात विद्यानगर व खाजा कॉलनी येथे असलेल्या सुरवातीला चाचणी घेतली जाणार आहे. एकेक मीटरने दररोज हे जलकुंभ भरले जाणार आहेत. त्यानंतर तेथून शहराच्या विविध भागात असलेल्या आठ ते दहा जलकुंभांत टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे. त्यांच्यादेखील याच पद्धतीने चाचण्या घेणार येऊन क्षमता तपासली जाणार आहे.

पुरेसा पाणीपुरवठा होईल


नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने अत्यंत गतीने हे काम पूर्ण करून घेतले आहे. लवकरच नागरिकांना वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा विश्वास देतो.
- भगवानराव वाघमारे, उपमहापौर, महापालिका परभणी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com