गेवराई : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे शनिवारी दुपारी चार वाजता, चार फुटाने उंचावून एक लाख तेरा हजार १८४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात एक लाख सोळा हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र सावधानता बाळगावी असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या ग्रामस्थांना केले आहे. शिवाय ३२ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पंचाळेस्वर येथील दत्त मंदिराला पाण्याने वेढा घातला आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-जास्त होत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. शनिवारी जायकवाडी धरणातून सांडव्याव्दारे एक लाख तेरा हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. हा विसर्ग वाढवण्यात येणार असून यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान नाशिक तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात एक लाख सोळा हजार क्युसेक पाणी मावते परंतु जायकवाडी प्रकल्पातून एक लाख पंचवीस हजार ते दीड लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावांना पाण्याचा विळखा पडणार आहे.
दरम्यान राक्षभुवन व पंचाळेश्वर येथील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अधिकचे पाणी सोडल्यास गोदाकाठच्या गंगावाडी, राजापूर या गावाला पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या गावांतील नागरिकांनी गोदापात्रात जावू नये. पशुधनाची देखील काळजी घ्यावी. गोदापत्रातील वाढती पाणी पातळी पाहता सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या गावांना सतर्कतेचा इशारा
आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापुर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगाव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या ३२ गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.