‘या’ जिल्ह्यात १२ एप्रिलपासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध

rice
rice

हिंगोली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून आजपर्यंत ३१ हजार बारा शिधापत्रिका धारकांना सहा हजार २१५.२१ क्‍विंटल अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ (ता.१२) एप्रिलपासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ८.४३ लाख आहेत. या लाभार्थ्यांना ७९७ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

बीपीएल कार्डला असा लाभ
बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रुपये किलो दराने प्रती कार्ड २३ किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने प्रती कार्ड १२ किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जात आहे.

केशरी रेशनकार्डला असा लाभ
केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने प्रती व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जात आहे. जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे चार हजार ०६८३.८३ क्विंटल गहू, दोन हजार १५१.३८ क्विंटल तांदूळ, तर ४२.४५ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ४२ हजार ३०८ शेतकरी शिधापत्रिका धारकांना एप्रिलमध्ये प्रति व्यक्ती तीन किलो गहु व दोन किलेा तांदुळ देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्डधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ (ता.१२) एप्रिलपासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासन यंत्रणा घेतेय खबरदारी
योजनेकरता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम वाशिमकडून प्राप्त करून घेतले जात असून (ता.१२) एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जूनमध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.

असे केले आहे आवाहन
सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलिस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गावामध्ये अन्नधान्य उचल केल्यावर रास्तभाव दुकानदार यांनी लॉउड स्पिकरद्वारे लाभार्थ्यांना कळवुन अन्नधान्य पुरवठा करावा, रास्तभाव दुकानदार अन्नधान्य वाटप करताना लाभार्थ्यांना एक मिटर अंतरावर उभे करणेसाठी मार्कीग करावी व अन्नधान्य वाटप करावे, तसेच मास्क व सॅनिटाईझरचा वापर करण्यासाठी लाभार्थ्यांना व रास्तभाव दुकानदार यांना वापर करणेसाठी सक्त आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com