नवीन नळजोडणी प्रक्रियेलाही ‘कोरोना’चा विळखा, कसा, कुठे तो वाचा...

news
news

परभणी ः अगोदर नागरिकांची उदासीनता व नंतर कोरोनाच्या विळख्यात महापालिकेची नळजोडणी प्रक्रिया अडकली आहे. नळजोडणी मागणीचे दोन हजारांवर अर्ज प्राप्त झालेले असून त्यातील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात अनेक भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पालिकेला आता नळजोडणीची कामे युद्ध पातळीवर हाती घ्यावी लागणार आहेत.

महापालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना तीन महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झालेली आहे. परंतु, त्या वितरण व्यवस्थेवर नळजोडण्या घेतल्या गेल्या नसल्यामुळे ‘पाणी उशाशी व कोरड घशाशी’, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर येणार आहे.

वितरण व्यवस्था नसलेल्या भागात टंचाई ?
शहराच्या अनेक भागात जुनी वितरण व्यवस्था नाही. त्यामुळे या भागात दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करता येत असे. परंतु, आता नवीन योजनेत जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्या परिसरातील जलकुंभांमध्येदेखील पाणी भरले. परंतु, नळ कनेक्शन नसल्यामुळे पाणी सोडता येत नाही. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे आतापर्यंत या भागातील नागरिकांचे धकले. परंतु, आता हातपंप, विंधन विहिरी आटण्यास सुरवात झाली असून नळ जोडण्या घेतल्या नाही तर त्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या भागातील नागरिकांना आता तूर्त मालमत्ता कर भरण्यासाठीदेखील सूट देण्यात आलेली आहे.

वितरण व्यवस्था नसलेल्या भागात २० हजार कुटुंब
या भागात जवळपास १५ ते २० हजार कुटुंब असण्याची शक्यता आहे. त्यातील दोन हजारांवर नागरिकांनी नळजोडणीसाठी अर्ज केले असून दोनशेपेक्षा अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या, तर आठशेपेक्षा अधिक जोडण्यांची स्थळपाहणी होऊन केवळ जोडणी देणे शिल्लक आहे. परंतु, त्यावर लॉकडाउनचा परिणाम झाला असून साहित्य मिळण्यास अडचणी येत आहेत. कदाचित तीन मेनंतर लॉकडाउन उठल्यास जोडणीच्या प्रक्रियेला गती येईल. अन लॉकडाउन वाढले तरी पालिकेला विशेष परिस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. प्रभाग समित ‘अ’ मध्ये सहाशे अर्ज, ‘ब’ मध्ये सातशे अर्ज, तर ‘क’ मध्येदेखील सातशेवर नागरिकांनी जोडणीसाठी अर्ज दाखल केलेले आहे.

अर्जांचा निपटारा करण्याचे काम सुरु
लॉकडाउनचा नळजोडणी प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. तरीदेखील आलेल्या अर्जांचा निपटारा करण्याचे, जोडणी देण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर किमान नळजोडण्या नसलेल्या भागातील नागरिकांनी कनेक्शन घ्यावीत, जेणेकरून त्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. त्या भागातील नागरिकांना सवलतदेखील देण्यात आलेली आहे. लॉकडाउन व रस्ते बंद असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे नळजोडणी घेणे गरजेचे आहे.
-रमेश पवार, आयुक्त, महापालिका, परभणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com