द्राक्ष उत्पादक अडचणीत

file photo
file photo

परभणी : लॉकडाउनमुळे बाहेरील व्यापारी जिल्ह्यात येऊ शकत नाहीत आणि बाहेर माल नेल्यास घ्यायला कोणी नाही, अशा स्थिती जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. फळबागायातींकडे नुकतेच वळलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का असून कोरोनामुळे सर्व क्षेत्रावर आघात झाला असताना सर्वाधिक नुकसान हे शेतमालाचे होत असल्याचे चित्र आहे.
परभणी जिल्ह्याची जमीन एवढी सुपीक आहे की, पेराल ते उगवणारच याप्रमाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे पीक जोमात येते. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील तरुण शेतकरी नवनवीन प्रयोगाकडे वळले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतात सिंचनाची सोय करत बागायती शेती सुरू केली आहे. त्यातून ते फळबागाकडे वळले आहेत. त्यातून संत्रा-मोसंबी, पेरू, अंजीर, द्राक्षांच्या बागा वाढल्या आहेत.
द्राक्ष म्हटले की, नाशिक जिल्हा डोळ्यासमोर येतो. परंतु, सध्या उपलब्ध सुविधांचा लाभ घेत परभणी जिल्ह्यातदेखील द्राक्षांच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या द्राक्ष बागा सध्या फळांनी लगडल्या असताना कोरोनाच्या संकटाचा फटका या बागायतदारांना बसला आहे.


तोडणीला मजूर नाहीत
जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे सात ते आठ शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये द्राक्ष बागा लावलेल्या आहेत. यंदा प्रथमच फळधारणा झाल्याने तोडणीला फळे आली आहेत. काही शेतकऱ्यांच्या बागेची विक्री लॉकडाउनपूर्वीच झाली आहे. परंतु, ज्यांची फळधारणा उशिरा झाली होती. अशा बागा सध्या फळांनी लगडल्या आहेत. लॉकडाउनमुळे या बागेतील फळांची तोडणी करता येत नसल्याने वेलींवरच द्राक्ष खराब होत आहेत. तोडणीला मजूर येत नाहीत. तसेच वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे बाहेर राज्यातदेखील उठाव नसल्याचे चित्र असल्याने द्राक्ष विक्रीसाठी न्यायचे कसे? असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांना पडला आहे.


 व्यापाऱ्यांकडून खरेदी नाही
बाहेर नेल्यास व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारात किरकोळ विक्रीवर भर द्यावा लागत आहे. शेवडी येथील द्राक्ष उत्पादक विश्वनाथ काळे यांनी २०१७ मध्ये बॅंकेचे कर्ज काढून बागेची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यांना तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च आला आहे. यंदा उत्पादन सुरू झाले असल्याने पहिल्या वर्षी किमान आठ लाख रुपयांचा उत्पन्न आपेक्षित आहे. परंतु, बाजारपेठ ठप्प झालल्याने या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

मालाला उठाव नाही
१२ लाख रुपये खर्च करत द्राक्ष बागेची उभारणी केली आहे. आता डोळ्यादेखत कष्टाने पिकवलेली बागेत फळे सडून जाताना पाहावे लागत आहे. मालाला उठाव नसल्याने कोणताही व्यापारी माल घेण्यास पुढे येत नसल्याने नाईलाज झाला आहे.
- विश्वनाथ काळे, द्राक्षउत्पादक, शेवडी (ता.जिंतूर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com