बालविवाहाची माहिती न दिल्यास कारवाई

हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा गावकारभाऱ्यांना इशारा
child marriage
child marriagesakal

हिंगोली : ग्रामपातळीवरील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष, सरपंच, सदस्य, सचिव अंगणवाडी सेविका, समितीतील सदस्य, पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनी गावात होणाऱ्या बालविवाहाची माहिती वेळेत दिली नाही तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले आहेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृती दल व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग व पोलीस विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, ग्रामपातळीवरील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच, सदस्य सचिव अंगणवाडी सेविका, समितीतील सदस्य पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनी आपापल्या गावात बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गावात होणाऱ्या बालविवाहाची मिळताच तत्काळ चाइल्ड लाइन १०९८ वर व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविणे अपेक्षित आहे. आपणास बालविवाहाची माहिती असतानाही आपण ती माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास व ऐनवेळी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल; तसेच चाइल्ड लाइनच्या १०९८ क्रमांकावर बालविवाहाची खोटी माहिती दिल्यास अशा व्यक्तीविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधवा झालेल्या शेतकरी महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून द्यावा. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील तालुका, शहरी व ग्रामस्तरावरील शंभर टक्के बाल संरक्षण समित्यांची स्थापना तत्काळ करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना श्री. पापळकर यांनी दिल्या.

अनाथांच्या ६१ अर्जांना मान्यता

कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आलेल्या ६१ अर्जांना बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच कोविडमुळे एक पालक गमावलेल्या नव्याने आढळून आलेल्या २९ बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

रोखले ५५ बालविवाह

कायदा व परिविक्षा अधिकारी अनुराधा पंडित यांनी जिल्ह्यात आतापर्यंत ५५ बालविवाह रोखण्यात यश आल्याचे सांगितले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तालुकास्तरावर पाच तालुका संरक्षण समिती, नगर, वॉर्ड, प्रभागस्तरावर ८७ पैकी ८० बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आले आहेत. ग्राम पातळीवर ५६३ ग्रामपंचायतींपैकी ५०० ग्रामपंचायतीमध्ये गाव बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित समित्याही लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा सर्वे

जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा ३२ हॉटस्पॉटवर जाऊन सर्वे करण्यात आला. यात सात हॉटस्पॉटवर १०० बालके आढळून आली. या सर्व बालकांची एनसीपीसीआर पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ६६ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल तयार करण्यात आले आहेत. या बालकांचे महिला व बालविकास आयुक्तांकडून ताबा आदेश प्राप्त झाले आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com