
हिंगोली : ओल्या जखमां वर मलमपट्टी!
कुरुंदा : कुरुंद्यासह परिसरात अतिवृष्टी झाली. शेतजमिनी खरडून गेल्या. अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे पशुधन वाहून गेले. पुराचे पाणी घरांत घुसल्याने अन्नधान्य, कपडे भिजले. पूरग्रस्तांच्या या ओल्या जखमा भरून येणाऱ्या नसल्या तरी त्यावर मलमपट्टी करून त्यांना आधार देण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. प्रशासनाने तातडीने रविवारी (ता. १०) १९६ जणांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले. उर्वरित कुटुंबांचे तत्काळ राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यांनासुद्धा मदत केली जाणार आहे.
परिसरात पुरामुळे किती नुकसान झाले याची पाहणी महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या संयुक्त पथक घरोघरी जाऊन करीत आहे. त्या अंतर्गत १९६ पूरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. उर्वरित कुटुंबीयांना मदत देण्यासाठी त्यांचे राष्ट्रीयकृत बँक उघडले जावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. कुरुंदा व परिसरात पुरामुळे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंब उघड्यावर आले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे गावात ठाण मांडून बसले आहेत.
पेयजलाची समस्या
पुरामुळे गावातील जलसाठे दूषित झाले आहेत. त्यामुळे पाण्यातून नागरिकांना जलजन्य आजार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी शनिवारी सायंकाळपासूनच आरोग्य विभागचे पथक पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करीत आहे.
धान्य, भोजन वाटप
कुरुंदा येथे ग्रामस्थांना तीन स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे; तसेच ग्रामस्थच एकमेकांना सहकार्य करून भोजन वाटप करीत आहेत. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पापळकर हे स्वतः परिस्थिवर लक्ष ठेवून आहेत.
प्रशासनाचे नियोजन असे
गावांत ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक
रविवारी सुटीच्या दिवशीही पथकातील कर्मचारी कार्यरत
पथकामध्ये बीडीओ, सहाय्यक बीडीओ
पाच मंडळाधिकारी, २८ तलाठी, ११ ग्रामसेवक व इतर
चार कर्मचारी.
या गावांना फटका
वसमत तालुक्यातील कुरुंदा, आसेगाव, टाकळगाव, इंजनगाव, रुंज, आसेगाव, किन्होळा, महमदपूरवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला.
पैसे नको साहेब...
‘साहेब आम्हाला तुटपुंजी आर्थिक मदत देऊ नका, गावात येणाऱ्या नदीच्या पाण्याचा व गावातील नाल्यावर झालेले अतिक्रमण काढून पुराचे पाणी गावात येणारच नाही, यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी (ता. १०) खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली आहे. भाजप नेते रामदास पाटील सुमठानकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, राजू चापके, खोबराजी नरवाडे, श्रीकांत देशपांडे आदींनीही गावात भेटी देऊन पाहणी केली.
Web Title: Hingoli Flood Victims In Kurunda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..