हिंगोली : सेनगावकरांना आरक्षण सोडतीनंतर नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा, तर प्रभाग सतराने वेधले दिग्गजांचे लक्ष

file photo
file photo

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये अनेकांच्या राखीव जागेला आरक्षण सूटल्यानंतर दिग्गजांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याचे चित्र आहे. यामुळे आता कोन-कोन एकत्र येणार आणि कोन-कोन आत्मनिर्भरची भूमिका घेणार याकडे सर्व सेनगाव वाशियांचे लक्ष लागून आहे.

२०१५ च्या निवडणुकीत अनेकांना मोजक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या पाच वर्षामध्ये सेनगाव शहराला कोट्यावधी रूपयांची विकास कामे आली. यात रस्ते, पाण्याचा प्रश्न, शौचालय, घरकुल अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. परंतु बऱ्याच कामांवर सेनगाव शहर वाशियांची नाराजी दिसून येत आहे. अनेक प्रभागात पाहिजे तसा विकास झालेला दिसून येत नाही. त्यामुळे ही नाराजी येणाऱ्या निवडणुकीत मतदानरूपी दिसून येते की काय. हे पाहणे गरजेचे आहे. काल सोडण्यात आरक्षणामध्ये अनेकांचे गड कोसळल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणार यात मात्र शंका नाही. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे चार, भाजपाचे चार, मनसेचे तीन तर सेनेने दोन जागेवर विजव मिळवला होता. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी रस्सी खेच झाली होती. त्यावेळी दिग्गजांनी अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते. काँग्रेस-सेना-मनसे हे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ होते. परंतु ठरले एका बरोबर आणि थाटले दुसऱ्या बरोबर असे करून भाजपाने राष्ट्रवादी आणि सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले होते. 

यावेळी मात्र चित्र काहीसे वेगळे दिसून येतील असे दिसून येत आहे. कारण आरक्षित जागांवर आरक्षण सोडल्यामुळे अनेकांची गोची निर्माण झाली. मात्र प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण पुरूषाला जागा सोडल्यामुळे या प्रभागाने अनेक दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. प्रभाग .१७ हा शेवटचा आणि सेनगाव पासून दोन किमी अंतरावर आहे. या प्रभागाला मागच्यावेळी सर्वसाधारण अनुसुचित जमाती असे आरक्षण सोडण्यात आले. त्यामुळे याकडे कुणीही फार काही लक्ष दिलेले नव्हते. परंतु यावेळी अनेकांचे लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे या प्रभागात चुरसीची लढत पहायला मिळू शकते. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार सेनगाव येथे तळ ठोकुन होते. यावेळी त्यांच्याकडे मनुष्य पाठबळ जरी वाढलेले असले तरी त्यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण मागच्यावेळी वरिष्ठ पातळीवर सेना आणि भाजप एकत्र असल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यास अडचण आली नाही. परंतु यावेळी मात्र सेना आणि भाजप हे वेगवेगळे लढतील असेच चित्र आहे. तर काँग्रेसकडे नवीन चेहरा आला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवली तर त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com