हिंगोलीकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे : पालकमंत्री वर्षा गायकवाड

varsha gaikwad
varsha gaikwad

हिंगोली : हिंगोलीकरांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. परंतु, पुढील काही दिवस अत्यंत संवेदनशील आहेत. जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.      

जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-१९) हा विषाणू मूळे पसरत असलेला साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणुंचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ (ता.१३) मार्च पासून लागू करून खंड दोन, तीन व चार मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्‍याबाबतची नियमावली देखील तयार करण्‍यात आलेली आहे. 

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

त्‍याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्‍य मंत्रालयांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, याकरिता जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. सदर आदेश हे आपल्या आरोग्याच्या संरक्षणाकरिता घेण्यात आले असून जनतेनी आपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 

दुरध्वनीवरून घेतला आढावा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दुरध्वनीवरून घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले, भविष्यातही असेच सहकार्य कायम ठेवून आपण सर्वजण मिळून या संकटावर मात करू असा विश्वास पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. 

आरोग्य तपासणी करणे गरजचे

दरम्‍यान, जिल्‍ह्यात बाहेरून येत असलेल्या नागरिकांनी संबधित विभागाकडे नोंद करावी तसेच आरोग्य विभागाकडे जावून तपासणी करून घ्यावी, सध्या जिल्‍ह्यात ग्रामीण भागातील अनेक जण कामानिमित्त, शिक्षणानिमित्त शहरात आहेत. सध्या ते आपआपल्या गावी परतत आहेत. त्‍यांनी देखील आपल्या स्‍वतःसह कुटुंबीयांची व इतरांची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी करणे गरजचे आहे.

सुचनाचे सर्वांनी पालन करावे

 जिल्‍ह्यात आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन तसेच शासकीय सर्व यंत्रणा सज्‍ज असून ते सांगत असलेल्या सुचनाचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पोलिस प्रशासनही बंद काळात नागरिकांनी घराबाहेर निघू नये, यासाठी जनजागृती करीत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com