४५ हजारावर जिल्हावासीयांची घरवापसी : वाचा कुठे?

file photo
file photo

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधांतर्गत आशा स्वंयसेविकांनी जिल्ह्यातील दोन लाख ४१ हजार ३६७ कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८० गावांतील एक हजार ८१७ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तब्बल ४५ हजार २७१ जिल्हावासीयांची देशाच्या विविध भागांतून घरवापसी झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आशा स्यंवसेविकांच्या माध्यमातून मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात ता. १८ मार्च ते ता. नऊ एप्रिल दरम्यान, जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दोन लाख ४१ हजार ३६७ कुटुंबांना आशा स्वयंसेविकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये एक हजार ११४ जणांमध्ये श्वसनविकाराची लक्षणे अढळून आली आहेत. त्यात संदर्भित रुग्णसंख्या ७०१ आहे. जिल्ह्यात कोरोनाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यासाठी एक लाख ८३ हजार ६५९ माहितीपत्रके वाटप करण्यात आली आहेत.

७१० गावांमध्ये नियमित फवारणी
दुसऱ्या टप्प्यातील ता. दहा एप्रिल ते दोन मेदरम्यान केलेल्या सर्वेक्षनानुसार जिल्ह्यातील २८० गावांतील एक हजार ८१७ लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यातील तीन लोकांना श्वसनविकाराचा त्रास आहे. मोठ्या शहरांतून आलेल्या पैकी दहा लोकांना श्वसन विकाराचा त्रास आहे. गावाबाहेर, शेतात २१५ जण लपून राहात असल्याचे या सर्वेत उघड झाले आहे. जिल्ह्यातील ७१० गावांमध्ये नियमित फवारणी होत आहे. ७२९ गावात नियमित स्वच्छता केली जात असल्याचे या सर्व्हेत दिसून आले.

बाहेरदेशातून आले १४ जण
देशासह परदेशात मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातील नागरिक गेले होते. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त हे लोक देशाच्या विविध भागात स्थिरावले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून या लोकांची घरवापसी सुरू झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या सर्वेक्षणात ता. १८ मार्च ते ता. नऊ एप्रिलपर्यंत बाहेरदेशातून जिल्ह्यात १४ लोक आले आहेत. तर देशांतर्गत भागातून तब्बल ३७ हजार ५४२ लोकांची घरवापसी झाली आहे. दुसऱ्या सर्वेनुसार ता. दहा एप्रिल ते ता. दोन मेपर्यंत सात हजार ७२९ लोकांनी आपले गाव गाठले आहे. अशी एकूण ४५ हजार २७१ जिल्हावासीय आपल्या मूळ गावी परतले आहेत.

परभणी पॅटर्न राज्यपातळीवर
परभणीत कोरोनाविषयी अधिक सतर्कता बाळगली जात आहे. कोणतीही हायगय केली जात नसून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविकांची मोठी मदत झाली. त्यामुळे राज्यभरात परभणी पॅटर्नची दखल राज्याच्या मुख्य सचिवांनी घेत राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यपातळीवर घेतली दखल
जिल्ह्यात अजूनही उर्वरित घरांचे तसेच ज्या गावात बाहेरगावांहून नवीन कुटुंब आले, अशांचे सर्वेक्षण सुरू आहे. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे. परभणी पॅटर्नची दखल राज्यपातळीवर घेतली आहे.
- ज्ञानेश्वर उदावंत, जिल्हा समूह संघटक (आशा)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com