उमरगा (जि.उस्मानाबाद) : पावसाअभावी (Rain Shortage) खरिप हंगामातील पेरण्याला उशीर झाल्याने राशीही उशीरा होत आहेत. काही मोजक्या क्षेत्रात आगोटी पेरण्या झाल्याने मूगाच्या राशी जवळपास संपल्या आहेत. आता उडीदा पाठोपाठ सोयाबीनच्या राशी सुरू झाल्या आहेत. दरम्यान अडत बाजारात मूग, उडीदाबरोबरच सोयाबीनची (Umarga) आवकही सुरू झाली आहे. अधून-मधून होणाऱ्या पावसामुळे गतवर्षीप्रमाणे दगाफटका होण्याच्या भितीने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या काढणीला, राशीला गती दिल्याचे चित्र शेत शिवारात दिसून येत आहे. उमरगा तालुक्यात खरिप पेरणीचे क्षेत्र अधिक असते. त्यात प्रामुख्याने तूर, उडीद, मूग व संकरित ज्वारीचे क्षेत्र असायचे आता गेल्या पाच - सहा वर्षापासुन सोयाबीनचे (Soybean Price) क्षेत्र वाढले आहे. यंदा जुन महिन्यात पाऊस वेळेवर झाला नसल्याने पेरण्याला विलंब झाला.
त्यानंतर मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने मूग, उडीद व सोयाबीनच्या वाढीला आवश्यक ते पोषक वातावरण मिळाले नाही. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या आधारावर पिके जगवली. त्यात पुन्हा अळ्या, किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने फळधारणेत विघ्न आले. अळ्याच्या नवा प्रकारामुळे फळधारणा कमी झाली. दरम्यान शेतकऱ्यांनी बरीच उठाठेव करून आता मूग, उडीदापाठोपाठ सोयाबीनच्या राशी सुरु केल्या आहेत. सोमवारी (ता.२०) दुपारी दमदार झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन एकत्रित करून सुरक्षितरित्या ठेवण्याची शेतकऱ्याची धावपळ सुरू झाली आहे.
सोयाबीनच्या दराचे 'अर्थशास्त्र' कोलमडले !
उमरगा अडत बाजारात मूग, उडीदाची आवक सुरू झाली आहे. हमीभावापेक्षा थोडा अधिक भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीप्रमाणे व आर्थिक खर्चानुसार पदरात अधिक रक्कम मिळत नाही. त्यात शासनाने अजुन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान सर्वाधिक क्षेत्र असेलल्या सोयाबीनच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. रोगराई नष्ट करण्यासाठी आर्थिक कष्ट घ्यावे लागले. उशीरा पेरणी झालेल्या सोयाबीनच्या काही क्षेत्रात शेतकरी शेंगा वाढीसाठी प्रयत्न करताहेत. बहुतांश क्षेत्रात सोयाबीन काढणीसाठी आले आहे. अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अधिक खर्च, मेहनत घेतली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीनला नऊ हजार प्रतिक्विंटल दर मिळण्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. त्यामुळे शेतकरी खुश होते. परंतु जेंव्हा काढणी सुरू झाली. अडत बाजारात आवक सुरु झाल्यानंतर दर गडगडला. साडेचार हजार ते पाच हजार तीनशेपर्यंत (प्रतिक्विंटल) दर मिळतोय. त्यात उताराही कमी मिळत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यंदा सोयाबीनच्या अर्थशास्त्र पक्के बसेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. आता अधून-मधून ढगाळ वातावरण, ऐन काढणीत होणाऱ्या पावसाच्या भितीने शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली आहे. एका बियाणे पिशवी क्षेत्रातील सोयाबिन काढणीसाठी चार हजार रुपये मजुरांना द्यावे लागत आहेत. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत सोयाबीन रानावर कुजले, गंजीच्या गंजी पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांनी काढणीसाठी मजूर, मळणी यंत्राची जुळवाजुळव सुरू केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.