...​या जिल्हा रुग्णालयातील ‘आयसीयू’ कक्षच कोमात

...​या जिल्हा रुग्णालयातील ‘आयसीयू’ कक्षच कोमात

Published on

हिंगोली : येथील सामान्य रुग्णालयातील आयसीयू कक्षात तज्ज्ञच उपलब्ध नसल्यामुळे लाखो रुपयांची महागडी यंत्रे धूळखात पडली आहेत. त्यामुळे हा कक्षच काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दर दिवशी उपचारासाठी येणाऱ्या दहा ते पंधरा गंभीर रुग्णांना नांदेडला रेफर करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी रुग्णालयातील पाणीप्रश्न, वॉर्डातील स्वछतेचा प्रश्न, तर कधी औषधींचा तुटवडा असतो. तसेच रुग्णालयातील रिक्त पदांचा मुद्दाही तेवढाच गाजत आहे. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने स्वतःलाच औषधी खरेदी करावी लागत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला भरती केल्यास प्राथमिक उपचार करून नांदेडला रेफर केले जाते. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांच्या खिशाला चाट बसत आहे.
मनुष्यबळाच्या मुद्यावर तर पूर्ण आरोग्य यंत्रणा गंभीर अवस्थेत आहे.

दररोज शंभर ते दीडशे रुग्ण होतात दाखल

 सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील रोज सुमारे शंभर ते दीडशे रुग्ण येतात. यात प्रामुख्याने विषबाधा, हृदयरोग, गंभीर दुखापत, अपघाती रुग्णांचा समावेश आहे. सामान्य रुग्णालयात महिला व बालरुग्णांची संख्या मोठी असताना स्त्री रोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्किनतज्ज्ञांबरोबर आयसीयूतील तज्ज्ञ नसल्यामुळे किमान प्रतिदिन दहा ते पंधरा रुग्णांना रेफर केले जात आहे.

नातेवाइकांकडून संताप

आयसीयू कक्षात मॉनिटरसह महागडी यंत्रे बसविण्यात आली असून गेली सहा महिन्यांपासून आयसीयू कक्षच बंद आहे. अतिगंभीर रुग्णांना केवळ अतिदक्षता कक्षात तपासणी करून वॉर्डमध्ये शिफ्ट केले जाते, अन्यथा प्राथमिक उपचार करून नांदेडला रेफर केले जात आहे. येथे रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांसह त्‍यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.


टेलिमेडिसिनद्वारे ९३४ रुग्णांची तपासणी

येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात ९३४ रुग्णांची टेलिमेडिसिनद्वारे तपासणी करण्यात आली आहे. यात हृदयरोग, क्षयरोग, कुपोषित बालके, स्किन आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे.
मागील वर्षात ६६४ रुग्णांनी रेडिओलॉजिची व २२९ रुग्णांनी स्किन आजाराची तपासणी केली आहे. या रुग्णांची तपासणी करून मुंबई येथील रुग्णालयात उपचार करून शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर या रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त होताच पुन्हा तपासणी केली जाते. जिल्ह्यातील एकूण ९३४ गंभीर रुग्णांची तपासणी केली असल्याची माहिती समन्वयक भारत भूषण रणवीर यांनी दिली.

वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा

येथील रुग्णालयातील आयसीयू कक्षात फिजिशियन व तज्ज्ञ अधिकारी नाहीत. रिक्त जागा भरण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातच रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. या कक्षाचे नवीन जागेत स्‍थलांतर होणार असून काही कर्मचाऱ्यांना या बाबत ट्रेनिंगचीदेखील गरज आहे. लवकरच ही व्यवस्‍था उपलब्ध होणार आहे.
-डॉ. प्रसादकुमार श्रीबास, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com