‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’

mi hingolikar
mi hingolikar

हिंगोली : कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हिंगोलीकर कोरानाबाबत गंभीर बनले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘स्‍वयंशिस्‍त पाळणार, घरीच थांबणार’ अशी प्रत्‍येकजण प्रतिज्ञा करत घरातच थांबत असल्याने शुक्रवारी (ता. तीन) शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:चे, कुटुंबीयांचे व समाजाचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने हिंगोलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

घरातच राहणार, सुरक्षित राहणार

त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी तीन दिवस प्रत्येकांनी घरीच थांबावे. उज्ज्वल व निरोगी आरोग्यासाठी आम्ही घराबाहेर पडणार नाही, मी हिंगोलीकर... घरातच राहणार, सुरक्षित राहणार, असा प्रत्येकजण निश्चय करत आहे. तसे मेसेजही शहरात सर्वत्र व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून रस्‍त्‍यावर शुकशुकाट जाणवत होता. शहरातील मेडिकल वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू नव्हती.

शिस्‍त पाळल्याचे चित्र

 खऱ्या अर्थाने शहरातील नागरिकांनी संचारबंदीची शिस्‍त पाळल्याचे दिसून येत होते. शहरातील काही भागात प्रवेशबंदीदेखील करण्यात आली आहे. यात वंजवारवाडा, तिरुपतीनगर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. गल्‍लीत येणारे सर्व रस्‍ते लाकडी बांबू लावून बंद करण्यात आल्याचे दिसून आले.

हिंगोलीत मेडिकल वगळता सर्व दुकानांना ‘लॉक’

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता. तीन) ते रविवारपर्यंत (ता.पाच) जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात मेडिकल वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १९ कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी गुरुवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवत जिल्हा बंदीचे आदेश काढले आहेत.

जिल्हा रुग्णालयात संशयित दाखल

 जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी पहिल्यांदाच दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा बचाव करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरा दिवसांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरिता एक दिवसाचे वेळापत्रक निश्चित केले होते. परंतु, या वेळेव्यतिरिक्त दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात धावत होती.

रविवारपर्यंत संपूर्णपणे बंद

त्यामुळे संचार बंदीच्या काळात शासकीय वाहन, वैद्यकीय कारणास्तव परवाना घेतलेले वाहन, अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवानगी घेतलेली वाहने, अत्यावश्यक सेवेमधील अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन ओळखपत्र असलेले यांची वाहने सोडून या व्यतिरिक्त इतर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्याकरिता सक्त बंदी करण्यात घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील औषधी सेवा वगळून सर्व दुकाने, बाजारपेठ, किराणा व भाजीपाला रविवारपर्यंत संपूर्णपणे बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com