आता लेकीच्या लग्नाला या...! कर्जमुक्त शेतकऱ्याने  मुख्यमंत्र्यांना दिले निमंत्रण

file photo
file photo

परभणी :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्ष लाभ सोमवारी (ता.२४) जिल्ह्यातील पिंगळी (ता.परभणी) आणि गिरगाव (ता. सेलू) या दोन गावांतील शेतकऱ्यांना मिळाला आहे. दरम्यान, आता कर्जमुक्ती झाली असून लेकीच्या लग्नाला या साहेब...! असे आग्रहाचे निमंत्रण पिंगळी (ता.परभणी) येथील शेतकरी विठ्ठल गरुड यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिले.  

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २४) महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी व गिरगाव (ब्रु) येथील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदी उपस्थित होते.


अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
पुढे बोलतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची कामे सुरळीतपणे पहिल्याच दिवशी सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून अधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांशी समजूतदारपणे वागून पुर्णत: सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे आयुष्य सहज सोपे (इझी गोईंग) कसे होईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तरी अधिकाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला न दुखावता आनंदाने व प्रामाणिकपणे योजनेची कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद 
 या वेळी त्यांनी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील रहिवाशी असलेले शेतकरी विठ्ठल रुस्तुमराव गरुड यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले एक लाख १५ हजार ८७५ रुपये कर्जमाफ झाल्याबद्दल संवाद साधला. शेतकरी विठ्ठल गरुड यांनी कर्जमाफीचा लाभ घेत असताना खूप सहजपणे लाभ मिळाला, कुठलीही किचकट प्रक्रिया पाहावयास मिळाली नाही, तसेच बँक व्यवस्थापक श्री. शिराळे यांनी सहकार्य केल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देऊन शासनाने प्रत्यक्ष कर्जमाफी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रमाणे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. 


शासनाच्या निर्णयाचे स्वागत
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी श्री. गरुड यांच्याशी संवाद साधून कर्जमाफीचा लाभ मिळताना त्रास झाला का, जमीन किती आहे, असे प्रश्न विचारले. पिंगळी येथील बाबाराव शंकरराव दामोदर यांचे एक लाख आठ हजार २७१ रुपयांचे कर्ज माफ झाल्याबद्दल संबंधित शेतकऱ्याने समाधान व्यक्त करून शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com