कळमनुरी तालुक्यात टंचाई उपाययोजना हाती घेतल्या जाणार
कळमनुरी ः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ चार कोटी ८८ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली असून या कृती आराखड्याअंतर्गत टंचाई असलेल्या गावांमधून उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमधून तात्पुरती पूरक नळ योजना दुरुस्ती, नळ योजना दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे, विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करणे, एप्रिल ते जून या काळात तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना असलेला चार कोटी ८८ लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे.
११३ गावांमधून १५२ खासगी विहिरी
जानेवारी ते मार्च या कार्यकाळात सत्तर गावांमधून तात्पुरती पूरक नळ योजना दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी दोन कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १०६ गावांमधून १२४ नवीन विंधन विहिरी घेण्याकरिता ७४ लाख ४० हजार रुपयांची तरतूद कृती आराखड्यात ठेवण्यात आली आहे. याशिवाय ११३ गावांमधून १५२ खासगी विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यासाठी ८२ लाख आठ हजार रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आले आहेत. वीस गावांत २२ ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ लाख २० हजार रुपयांची तरतूदही या मंजूर झालेल्या कृती आराखड्यामध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा - समगा, खरबी गावांची निवड, का ते वाचा...
२८ गावांमध्ये होणार सार्वजनिक विहिरींचे बांधकाम
शासनाकडून पिण्याच्या पाण्याकरिता प्रत्येक गावात पर्यायी व्यवस्था असावी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक विहिरींची काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक विहिरीसाठी सहा लाख ९८ हजार रुपयांची खर्चाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये पेठवडगाव, कळमकोंडा, असोला, कडपदेव, डिग्गी, रुद्रवाडी ,सिंदगी, पुयना, नवखा, वाई, तरोडा, कवडी, देवजना, गुंडलवाडी, येळेगाव तुकाराम, रामेश्वर तांडा, घोडा, कुंभारवाडी तर्फे चाफणात, कोंढूर, कांडली, दिग्रस तर्फे कोंढूर, तेलंगवाडी, सुकळीवीर, वारंगा तर्फे नांदापूर, येलकी, सांडस, भुरक्याची वाडी, काळ्याची वाडी या २८ गावांमधून पिण्याच्या पाण्याकरिता सार्वजनिक विहिरींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित गावांमधून पिण्याच्या पाण्याकरिता शासनाकडून मंजुरी दिलेल्या या पर्यायी व्यवस्थेची ग्रामपंचायत स्तरावर अजून सुरवात करण्यात आली नाही, हे विशेष!
हेही वाचा - पुस्तक विक्रीतून युवकाचा प्रपंच...
सामाजिक संघटनांकडून जनजागृतीचे काम
‘नेहमीच येतो उन्हाळा’ या धर्तीवर प्रशासनाकडून पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार केला जातो. मात्र, या कृती आराखड्यामधील नळयोजना व तात्पुरती पूरक नळ योजना दुरुस्तीची कामे दरवर्षी आलटून पालटून त्याच त्या गावात दाखविली जातात. त्या नळयोजना दुरुस्तीचे कोडे उलगडण्यासाठी गाव पातळीवर नागरिकांनी जागरूक असावे, याकरिता सामाजिक संघटनांकडून जनजागृतीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.