नवीन नांदेड ः ‘लायगो’करांनी निवडलेला प्रकल्प ‘लायगो’ हिंगोली येथे होत आहे. ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय शास्त्रज्ञांची संशोधनक्षमता यातून पुढे आली आहे. त्याशिवाय आजचे तरुण शास्त्रज्ञ पुढे येणे आवश्यक असल्याचे मत शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘गुरुत्वाकर्षणाच्या लहरी’ या विषयावर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे रविवारी (ता.15) विद्यापीठात व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, मंगला नारळीकर, मीरा भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांनी व्याख्यानातुन गुरुत्वाकर्षण लहरीतुन अवकाशातील रहस्य उलगडले. ज्यात त्यांनी विविध शास्त्रज्ञांची उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
तरंगांना गुरुत्वीय लहरी म्हणतात
अवकाशातील मोठ्या वस्तुमानाच्या घटकांमध्ये वेगाने होणाऱ्या प्रक्रियेतून अवकाश आणि काळाच्या पटलावर तरंग उमटतात. या तरंगांना गुरुत्वीय लहरी म्हणतात. ध्वनी इकडून तिकडे जातो तो लहरींच्या रूपात. प्रकाशसुद्धा लहरींच्या रूपात जातो.पाण्यामध्ये खडा टाकला की जलतरंग पसरताना दिसतात.
हेही वाचा-- विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’
न्यूटनच्या सिद्धान्ताहून सरस
न्यूटनने जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला तेव्हा त्याने असे गृहीत धरले होते की, एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर होणारा आकर्षणाचा परिणाम ‘तत्काल’ स्वरूपाचा असतो. म्हणजे हा परिणाम अनंत वेगाने इकडून तिकडे जातो. जेव्हा आइन्स्टाईनने व्यापक सापेक्षतेचा सिद्धान्त मांडला. न्यूटनच्या सिद्धान्ताहून सरस असल्याचे सांगण्यात आले.
गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव काल आणि अवकाश
गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव काल आणि अवकाश यांच्या मोजमापासाठी वापरलेल्या भूमितीवर पडतो. अवकाशात एक मोठा त्रिकोण प्रकाशकिरणांच्या मार्गानी आखला आहे. व्यापक सापेक्षतावादाच्या समीकरणातून या प्रश्नाचे ‘हो, नाही’ असे उत्तर शोधने सोपे नसल्यामुळे उलटसुलट दोन्ही प्रकारची उत्तरे मिळत होती. आइन्स्टाईनने एकदा आपल्या गणितातून या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर काढले. आइन्स्टाईनच्या सिद्धान्तात गुरुत्वाकर्षणाच्या लहरी नसतात, हा त्याचा निष्कर्ष अर्थातच महत्त्वाचा होता.
उघडून तर पहा...‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा
मुळात गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात
त्यावर एक सेमिनार व्हावा असे त्याला वाटले. प्रिस्टन येथील उच्च शिक्षणाच्या त्याच्या संस्थेत सेमिनार आयोजित झाला. पण आइन्स्टाईनला आपल्या गणितात चूक सापडली आणि ती दुरूस्त केल्यावर त्याला आढळले की, लहरींचे अस्तित्व नाकारणारा त्याचा निष्कर्ष चुकीचा होता. मुळात गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असतात, हे निश्चित झाल्यावरच मग प्रायोगिक मार्गाने त्यांचा शोध घ्यायचे प्रयत्न सुरू झाले. लायगो प्रकल्प कार्यान्वित झाला आणि या सूक्ष्मदर्शी शोधाला सुरुवात झाली. तिच्यात अनेक सुधारणा करून ‘अॅड्व्हान्स्ड लायगो’ नावाखाली पुन्हा वेध घेण्यास सुरुवात झाली.
एकदा वाचाच---अन् नांदेडचे कवी पडले गुलजारच्या प्रेमात
आवड असणारे विद्यार्थी या क्षेत्रात प्रगती करू शकतात.
जगभरातील पाचही ठिकाणच्या लिगो वेधशाळेमध्ये एकाच वेळी त्या दृष्टिक्षेपात पडायला हव्या आहेत तर त्या अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या लहरी आहेत असे समजण्यात येते. या क्षेत्रात पुष्कळ वाव असल्यामुळे विज्ञान आणि गणित यामध्ये आवड असणारे विद्यार्थी या क्षेत्रात प्रगती करू शकतात. यावेळी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व्याख्यान ऐकण्यासाठी आले होते. व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुतूहलाचे प्रश्न विचारले. तेवढ्याच साध्या, सरळ, आणि सोप्या भाषेत नारळीकरांनी त्याची उत्तरे दिली. डॉ.ए.व्ही.सरोदे यांनी सूत्रसंचालन केले.
|
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.