जालना : कपाशीचा एकाच वेचणीत खराटा

यंदा शेतकऱ्यांना पावसामुळे आर्थिक फटका
जालना : कपाशीचा एकाच वेचणीत खराटा
जालना : कपाशीचा एकाच वेचणीत खराटा sakal

अंबड (जि.जालना) : तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरिपाच्या सर्वच पिकांची दाणादाण उडाली आहे. सोयाबीन,मका,बाजरीचे पिकं चिखलात माखले तर कपाशीची बोंडे फुटून पावसामुळे काळी पडली आहे. दिवाळी पूर्वीच पहिल्याच वेचणीनंतर कपाशीचा पुरता खराटा झाला आहे.

यंदा शेतात कपाशीला जेमतेम कापूस फुटलेला आहे. त्यातच आता दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांनी जेमतेम कापसाच्या वेचणीला सुरुवात केलेली आहे. वेचणी केलेला कापूस लगेच बाजारात विक्री करणेही सुरू केले आहे. मिळणाऱ्या थोड्याफार पैशातून शेतकरी गरज भागवीत आहेत. दिवाळी सणाला पुन्हा उधारी, उसनवारी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. सोयाबीन,मका,बाजरी पिकांची वाताहत झाली आहे. तुरीचे पीक पावसामुळे जागेवरच उबळले आहे. यामुळे उत्पन्नाची आशा पूर्णपणे मावळली आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसुल होत नसल्याचे चित्र आहे. यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

दिवाळी हा महत्वाचा सण तोंडावर आला आहे. किराणा,कपडे आदी वस्तूची खरेदी करण्यासाठी घरात चणचण भासत आहे. शेतातील कोणताच माल विक्रीसाठी शेतकऱ्याच्या घरात शिल्लक नाही. यामुळे अगोदरच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याच्या नजरा आता नुकसान भरपाईकडे लागल्या आहेत.

जालना : कपाशीचा एकाच वेचणीत खराटा
जालना : मोसंबीच्या बागेवर चालविला जेसीबी शेतकऱ्यांचा नाइलाज

अंबड तालुक्यातील पारनेर, शिरनेर, चिंचखेड, गंगारामतांडा, राहुवाडी,नागोण्याचीवाडी, पिंपरखेड,वडीलासुरा,झिरपी, सोनकपिंपळगाव, ताडहादगाव,भालगाव,भाटखेडा, वलखेडा,पांगरखेडा,ढालसखेडा,बोरी,मसई,दुधपुरी, दहीपुरी,पराडा, मठजळगाव, भिवंडीबोडखा, नांदी, धनगरपिंपळगाव, कर्जत, हस्तपोखरी, लोणारभायगाव, बदापूर, चिकनगाव, खेडगाव, आलमगाव, मठपिंपळगाव, नागझरी, सारंगपूर, हारतखेडा, शेवगा, धनगरपिंपरी, मार्डी,शिराढोन आदी ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीचा पहिल्याच वेचणीत खराटा झाला आहे. तर सततच्या पावसामुळे तुरीचे उभे पीकही आता उबळले आहे. यंदा खरीप हंगामातून शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडलेले नाही. शेतकऱ्यांची सारी मदार आता रब्बी हंगामावर राहणार आहे.

'शेतकऱ्याच्या पाठीशी अस्मानी संकट लागले आहे. अतिवृष्टी, रोगराई, नैसर्गिक आपत्तीचे संकट पाठ सोडण्यास तयार नाही. शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शेती व्यवसाय सतत धोक्यात येत आहे . शेतकरी आता सतत आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा.'

-कृष्णा शिंदे ,शेतकरी, लालवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com