जालना : मोसंबीच्या बागेवर चालविला जेसीबी शेतकऱ्यांचा नाइलाज

सतत संकटांच्या मालिकेमुळे शेतकऱ्यांचा नाइलाज
तीर्थपुरी : येथील रामप्रसाद बोबडे यांच्या शेतातील मोसंबीची फळबाग जेसीबीच्या साह्याने मोडून काढताना.
तीर्थपुरी : येथील रामप्रसाद बोबडे यांच्या शेतातील मोसंबीची फळबाग जेसीबीच्या साह्याने मोडून काढताना. sakal

तीर्थपुरी (जि.जालना) : मोसंबी बागेवर सतत संकट येत असल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फळबागा आता पांढरा हत्ती पोसण्यासारख्या झाल्या आहेत. अनेक शेतकरी नाइलाजाने फळबाग मोडून काढत आहेत. दरम्यान, तीर्थपुरी येथील रामप्रसाद बोबडे या शेतकऱ्यांनी तीनशे झाडे असलेली व फळ धारणा झालेली मोसंबीची बाग काढून टाकली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मोसंबीच्या बागेपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. मोसंबीच्या बागेपासून चांगले उत्पादन होईल या आशेने मोसंबीची दोन एकरात तीनशे झाडाची लागवड केली. पाच ते सहा वर्षे जतन करून मोसंबीचे उत्पादन सुरू झाले. परंतु गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, सतत होणाऱ्या फळाची गळ,यंदा अतिवृष्टीमुळे झालेली गळ व मंगू रोगाचा प्रादुर्भाव या मुळे फळ बागेचे उत्पादन मिळेना. गतवर्षी मोठ्या प्रमाणात या फळबागेवर खर्च केला. त्यामुळे यंदा या बागेपासून चांगले उत्पादन होईल अशी आशा होती. परंतु यावर्षी वारंवार अतिवृष्टी झाल्यामुळे मोसंबीची गळ सुरू झाली.

हातात आलेल्या मोसंबीच्या पिकाची गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदा या बागेपासून तीन लाख रुपयांचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती, परंतु मोसंबी फळावर आलेला मंगू रोग व झालेली गळ त्यामुळे ५५ हजार रुपयांचे उत्पादन झाले. सततच्या मोसंबी फळावर येणाऱ्या संकटामुळे श्री.बोबडे यांनी नाइलाजाने मोसंबी झाडांवर जेसीबी चालविला आहे.

तीर्थपुरी : येथील रामप्रसाद बोबडे यांच्या शेतातील मोसंबीची फळबाग जेसीबीच्या साह्याने मोडून काढताना.
नांदेड : प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून

फळगळीमुळे आर्थिक नुकसान

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोसंबी बागेवर खर्च केला होता. त्यामुळे यावर्षी मोसंबी पासुन चांगले उत्पादन होईल अशी आशा होती. मोसंबीला चांगली फळ धारणा झाली होती. परंतु सततच्या पावसामुळे मोसंबी बागेत पाणी साचले.त्यामुळे मोसंबी बागेची मोठ्या प्रमाणात गळ झाली. यंदा खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

व्यापाऱ्यांकडून भाव कमी

या वर्षी मोसंबीची गळ सर्वत्र होत असल्याने शेतकरी मिळेल त्या भावाने व्यापाऱ्यांना मोसंबी विक्री करत आहे.शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता व्यापारी मोसंबीचे भाव कमी करून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बाहेरील व्यापारी खरेदीसाठी येत नसल्याने स्थानिक व्यापारी अडचणींचा फायदा घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

'गेल्या तीन वर्षापासून मोसंबी बागेपासून खर्चही मिळत नाही. दरवर्षी विविध संकट येतात. मोसंबी विमा भरून ही मिळत नाही. व्यापारी शेतकऱ्यांची गरज पाहून भाव ठरवतात. यंदा चांगली फळ धारणा झाली होती. परंतु मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळे होत्याचे नव्हते झाले, मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागले.त्यामुळे मोसंबीची फळबाग काढून टाकली.'

- रामप्रसाद बोबडे, शेतकरी, तीर्थपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com