Jalna News : यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा चाळिशी पार गेला आहे. अशा वातावरणात उष्णतेच्या लाटेने आजारी पडल्यावर पुरेसे उपचार व काळजी न घेतल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते.
उष्ण वातावरणात होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
तहान लागलेली नसली, तरी जास्तीत-जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकून घ्यावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम यामुळे उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना सावलीत ठेवावे. त्यांना पिण्यास पुरसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा.
रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी पहाटेच्या वेळी जास्तीत-जास्त कामाचा निपटारा करावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
तापमानात वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयप्रमुखांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात शालेय परिपाठ सकाळी कमीत-कमी वेळेत व राष्ट्रगीत, प्रतिज्ञापुरते मर्यादित ठेवावे. परिपाठ सावलीच्या ठिकाणी ठेवावा.
शाळेची वेळ, वर्गखोल्यांचे योग्य नियोजन करून सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवाव्यात. विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासिका, पी.टी. आदी घेऊ नये. शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
जे विद्यार्थी स्कूल बस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात, त्यांच्या व त्यांच्या पालकांसाठी वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड, सावलीची व्यवस्था करावी आदी सूचना दिल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.