करमाड (जि. औरंगाबाद) - राज्यातील शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहील.
त्यानंतरही, कुणी कर्जमाफी अर्ज न भरल्याने वंचित राहिल्यास त्यांना अर्ज दाखल करण्यास वेळप्रसंगी मुदत देऊन शेतकरी कर्जमुक्त करूनच योजना बंद करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
करमाड (ता. औरंगाबाद) येथे सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा मेळाव्यात पाटील उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे होते. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पाटील म्हणाले, ""मागील तीन वर्षांपासून चांगले सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणूस व शेतकरी सुखी व समाधानी झाला पाहिजे हा प्रामाणिक हेतू आहे. एक लाख 67 हजार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर कर्जमाफीचे पैसे आजपर्यंत जमा झाले आहेत. 43 हजार गावांमध्ये 200 मीटरने गावठाण हद्दीचा विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली असून 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.''
|