लहान मुलेही नैराश्याच्या फेऱ्यात : कशामुळे आणि काय काळजी घ्यावी ते वाचा

File photo
File photo

नांदेड : ताणतणाव हा सध्या सर्वांच्या आयुष्यातील परवलीचा शब्द आहे. वेगवान जीवन, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा आणि दगदग यामुळे प्रत्येक जण तणावाला सामोरा जातो. मात्र, आता या तणावाच्या आजाराने मानवी वयाचा फरक मोडला असून लहान मुलेदेखील ताणतणावांना सामोरी जात आहेत. सहा ते १५ वर्षे वयातील बालके डीप्रेशनचे रुग्ण म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

नैराश्‍याचे प्रमाण वाढतेच आहे
बालरोगतज्ज्ञ डाॅ. प्रमोद पाटील यांनी सांगितले की, लहान मुलांना मानसोपचारासाठी घेऊन येणारे पालक हे आता नवखे चित्र राहिलेले नाही. शरीराची रोगप्रतिकार शक्ती असते, तशी ती मनाचीदेखील असते. आजूबाजूला घडणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची प्रत्येक व्यक्तिची मानसिक प्रतिकार शक्ती वेगळी असते. लहान मुलेही याला अपवाद नाहीत. गेली अनेक वर्षे मुलांमध्ये नैराश्य अतिचंचलता यासारखी लक्षणे आढळत आहेत. सध्या त्या बाबत जागरुकता वाढल्याने ही मुले डाॅक्टरांपर्यंत येतात, ही गोष्ट खरोखरच सकारात्मक आहे. सर्वसाधारणपणे सहा - सात वर्षे वयापासून पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये नैराश्य, चंचलपणा, अस्थिरता ही लक्षणे दिसत असल्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होते. 

पालकांची जबाबदारी
मुलांना त्यांच्या भूमिकेतून समजून घेऊन आपण अपेक्षाचं ओझं त्यांच्यावर न लादता त्यातून योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. नकळत लक्ष ठेवून दिवसभराचा आढावा त्यांच्याकडून घ्यावा. संवाद संपला की एकाकीपण, निराशा घेरून टाकत असते. 

याकडे लक्ष द्यावे
अभ्यासात अत्यंत हुशार असलेले सहा ते सात वर्षांचे मूल अचानक मागे पडत असेल, सतत काही तरी दुखत असल्याची तक्रार करीत असेल, त्याला भूक लागत नसेल, चिडचिड वाढत असेल, शाळा नको वाटत असेल, मित्र-मैत्रिणी किंवा भावंडांबद्दल राग दाटून येत असेल, तर अशा मुलांकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना तणावमुक्त केले पाहिजे.

भावनिक साक्षरता आवश्यक
सध्याच्या शिक्षणपद्धतीतून बौद्धिक साक्षरता येते ः पण भावनिक साक्षरता येतच नाही. हव्यासापायी स्पर्धा वाढवून लेकरांचे रेसचे घोडे बनविले जात आहेत. हिंसाचारी मोबाईल गेममुळे मुलांमधील हिंस्त्रता वाढत आहे. घरी किंवा शाळेत मुलांचा भावनिक निचराच होत नाही.
- डाॅ. सुरेश सावंत (शिक्षणतज्ज्ञ)

मानवी जीवन गुंतागुंतीचे
आज मानवी जीवन अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. वरकरणी आनंदी दिसणारी माणसं खरोखरच आनंदी असणारी असतीलच हे सांगता येत नाही. काम, मग ते नोकरी, व्यवसाय कोणतंही असो, माणूस असंख्य पातळीवर ताणतणावातच असतो.
- व्यंकटेश चौधरी (शिक्षण विस्तार अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com