लॉकडाउनचा रेशीम उत्‍पादकांना फटका

Hingoli reshim
Hingoli reshim

कळमनुरी (जि. हिंगोली) :  कोरोना आजाराची पार्श्वभूमी व त्यानंतर सर्वत्र झालेले लॉकडाउन पाहता बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तूच्या आस्थापना वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा मोठा फटका रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून तयार झालेले रेशीम कोषसाठी खरेदीदार मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम कोष व्यवस्थित साठवून ठेवण्यासाठी धावपळ चालवली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक जोडव्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाची कास धरली आहे. कळमनुरी, डोंगरकडा, दांडेगाव, घोळवा, सिंदगी, जांब, घोडा, साळवा व परिसरामधील शेतकऱ्यांनी काही वर्षांपासून जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आवश्यक ती माहिती व मार्गदर्शन घेऊन शेतात रेशीम उद्योग सुरू केला आहे. त्यामध्ये तुती लावगड व शेड उभारणी करून शेतकऱ्यांनी या उद्योगात जम बसविला होता.

 रेशीम कोष विक्रीसाठी तयार

शेतकऱ्यांकडे तयार झालेले रेशीम कोष शेतकरी वर्ग कर्नाटकामधील बेंगलुरू, जालना, पूर्णा येथील व्यापाऱ्यांना ५० ते ६० हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने विक्री करत होते. मात्र, आता तालुक्यातील शेतकऱ्यांकडे रेशीम कोष विक्रीसाठी तयार असताना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात झालेल्या लॉकडाउननंतर बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तयार असलेल्या रेशीम कोषाकरिता खरेदीदार व्यापारी भेटत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

व्यापाऱ्याकडून खरेदीस नकार

 तालुक्यातील बहुतांश रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडे दोन ते चार क्विंटलपर्यंत रेशीम कोष विक्रीसाठी तयार आहेत. मात्र, खरेदीदार मुख्य व्यापाऱ्याकडून खरेदीस नकार देण्यात आल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी भाव पाडून प्रतिक्विंटल १५ ते वीस हजार रुपये दराने रेशीम कोषांची खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ३५ ते ४० हजार रुपये होणारे नुकसान पाहता काही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी तयार असलेल्या रेशीम कोषांची साठवणूक करता येते का या बाबत तज्ज्ञांकडून माहिती घेत आहेत.

वाळवून ठेवण्याची तयारी

तयार केलेले कोष साठवून ठेवण्याकामी पूर्वतयारी चालवली आहे. रेशीम तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेल्या माहितीप्रमाणे विक्रीसाठी तयार झालेले रेशीम कोष कडक उन्हामध्ये काही दिवस वाळविल्यानंतर व्यवस्थितरीत्या काळजी घेत हे रेशीम कोष तीन महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतात. हा तज्ज्ञांचा सल्ला ग्राह्य मानून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी तयार झालेली कोष उन्हामध्ये वाळवून ठेवण्याची तयारी चालवली आहे.

खरेदीदार मिळत नाहीत

कोरोना आजारामुळे बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे विक्रीसाठी तयार झालेल्या रेशीम कोषांकरिता खरेदीदार मिळत नाहीत. काही व्यापारी भाव पाडून मागणी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या स्थितीत रेशीम कोष साठवून ठेवण्याचे प्रयत्न आहेत.
-संभाजी कऱ्हाळे, शेतकरी, रेशीम उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com