Latur : नद्या-प्रकल्प कोरडेठाक, पण विसर्गाचा झाला साक्षात्कार!;कार्यकारी अभियंत्यांनी लिहिले चार जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या इशाऱ्याचे पत्र

मांजरा, निम्न तेरणा प्रकल्प मृतसाठ्यावर आहेत. नद्या कोरड्याठाक आहेत, पाऊस पडत असला तरी ही सुरवात आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Latur
Latur sakal

लातूर : मांजरा, निम्न तेरणा प्रकल्प मृतसाठ्यावर आहेत. नद्या कोरड्याठाक आहेत, पाऊस पडत असला तरी ही सुरवात आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशी परिस्थिती जिल्ह्यात असताना पाटबंधारे विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. मांजरा, तेरणा, तावरजा नद्यांच्या काठावरील गावांना आपल्या स्तरावर अतिदक्षतेचा इशारा द्यावा, असे पत्रच या विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ना. पाटील यांनी चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. साइटवर न जाताच या कार्यकारी अभियंत्यांनी असे पत्र लिहिले असून, आपले काम दुसऱ्याच्या अंगावर लोटण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे.

गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मांजरा तसेच निम्न तेरणा प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम तसेच लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या पाऊस पडत असला, तरी सरासरी शंभर मिलीमीटरही पाऊस झालेला नाही. खरीप पेरण्यायोग्यही पाऊस झालेला नाही. शेतातून पाणी अद्याप बाहेर पडलेले नाही. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना पाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा पाटबंधारे विभागाचा अजब कारभार समोर आला आहे.

काय म्हटलेय पत्रामध्ये?

या विभागाचे कार्यकारी अभियंता अ.न. पाटील यांनी सोमवारी (ता. दहा) लातूर, धाराशिव, बीड; तसेच बिदर (कर्नाटक) या चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. मांजरा, तेरणा व तावरजा या नद्यांच्या काठांवरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देणेबाबत हा पत्राचा आशय आहे.

मांजरा, तेरणा व तावरजा नद्यांवरील बॅरेज, कोल्हापुरी बंधारे यांच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पर्जन्यवृष्टी होऊन येवा असाच राहिला, तर प्रकल्प केव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. तरी मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहिलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा आपल्या स्तरावरून देण्यात यावा, जेणे करून जीवित व वित्तहानी होणार नाही, असे पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.

पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी साइटवर जाऊन पूर्ण माहिती घेणे आवश्यक असते. पण, येथे मात्र या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मात्र कार्यालयात बसून साइटवरची कोणतीही माहिती न घेता, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा नसताना असे पत्र चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. यातून आपले काम दुसऱ्याच्या अंगावर लोटण्याचाच हा प्रकार दिसून येत असल्याची चर्चा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com