Marathwada Sahitya Sammelan : जीवनाला साहित्यापासून वेगळं करता येत नाही - डॉ. जगदीश कदम

जीवनाला साहित्यापासून वेगळं करता येत नाही. जगण्याला चिकटून येणारं साहित्यच दीर्घकाळ टिकून राहिलेलं आहे.
Marathwada Sahitya Sammelan
Marathwada Sahitya SammelanSakal

गंगापूर - जीवनाला साहित्यापासून वेगळं करता येत नाही. जगण्याला चिकटून येणारं साहित्यच दीर्घकाळ टिकून राहिलेलं आहे. जगतगुरू तुकोबारायांनी जगण्याचे पीळ आपल्या अभंगांतून मांडले. जे आतून येतं तेच अस्सल असतं. ते झऱ्यासारख झरझरत येतं. त्याच्या येण्याचा ओघ अमोघ असतो. कोणालाच रोखता येणार नाही इतकी धाकदार गती त्याच्या ताब्यात असते. हा ताबा तो तंतोतंत उधळून लावतो. तेव्हा कुठं तुकोबांच्या अभंगाचं अपूर्व दर्शन घडतं असे प्रतिपादन जेष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांनी केले.

शनिवारी (ता. दोन) शहरातील मुक्तानंद महाविद्यालयात आयोजित ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. आमदार सतीश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सम्मेलनात उद्घाटन माजी आमदार प्रकाश सोळुंके यांनी केले.

स्वागताध्यक्ष माजी आमदार अँड. लक्ष्मणराव मनाळ होते. यावेळी मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते, आमदार विक्रम काळे, लेखक फ. मू. शिंदे, भरत ससाने, लक्ष्मीकांत देशमुख, ऋषिकेश कांबळे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुवर्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना लेखक कदम म्हणाले की, लेखन ही घाईघाईत उरकण्याची गोष्ट नाही. आंबाडी नीट भिजल्या शिवाय ताग काढता येत नसतो. तसंच काहीसं अनुभवांचं असतं. अनुभव मनात मुरल्याशिवाय मखरात मांडणं ही अनेकदा लेखकाची फसगत असते. लेखनात चकव्याच्या खूप जागा असतात. त्या जागा हुकविल्याशिवाय चिंतनाच्या पातळीवर आपल्या लेखनाचं मूल्य वाढत नसतं. हे लिहित्या हातांनी लक्षात घ्यायला हवं.

आपल्या अवतीभोवतीचे पर्यावरण खूप बिघडले आहे. मूल्यांची खूप पडझड होत असलेल्या कळातून तुम्ही आम्ही चाललो आहोत. सत्यापासून दूर लोटणारी अदृश्य शक्ति आपणाला वेढून आहे. तिचा विळखा कधी आणि कसा पडेल ते सांगता येत नाही. नव्या पिढीला या आभासांनी भामिष्ट करण्याचा विडाच उचलला आहे. शब्दावरचा विश्वास उडत चालला आहे.

आपण जे बोलतो, आश्वासन देतो ते पाळण्यासाठीच असतात. याचा विसर भल्याभल्यांना पडला आहे. कुठल्याही गोष्टीची सुरवात आपल्यापासून झाली पाहिजे असे कोणत्याही धुरिंधरांना वाटत नाही. असेही ते म्हणाले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. सी. एस. पाटील यांनी अभार मानले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रद्द

येथील कार्यक्रमात मुख्य उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पवार दिवसभर शहरात थांबून साहित्य सम्मेलनासह जिल्ह्याची आढावा बैठक व पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, हेलीकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. एनवेळी उद्घाटक पदाची जवाबदार प्रकाश सोळुंके यांच्याकडे सोपविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com