हिंगोलीत पाच ठिकाणी भरणार शुक्रवारी बाजार

Hingoli bazar
Hingoli bazar

हिंगोली : कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर शहरात दिवसाआड भरणारा बाजार बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारी (ता. दहा) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात पाच ठिकाणी बाजार भरला जाणार असल्याची माहिती जिल्‍हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोमवारी (ता. सहा) आठ ठिकाणी बाजार भरला होता. मात्र, त्‍या दिवशी बाजारात मोठी गर्दी झाली होती. दुचाकी व चारचाकी वाहनास बंदी असताना मोठ्या प्रमाणावर वाहने रस्‍त्‍यावर आली होती.

दिवसाआड भरणारा बाजार रद्द

 जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरून वाहने जप्त करण्यास पोलिस प्रशासनाला सांगितले होते. तसेच दिवसाआड भरणारा बाजार रद्द करून आता शुक्रवारी (ता. दहा) ठेवण्याचे आदेश श्री. जयवंशी यांनी दिले होते. त्‍याप्रमाणे शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात नवीन पाच ठिकाणी बाजार भरणार आहे.

एकतर्फी रस्‍त्‍यावर बाजार भरणार 

 शहरातील रामलीला मैदान, जिल्‍हा परिषद शाळा, मंगळवारी आठवडे बाजार, रेल्‍वे मैदान (आरोग्य शिबिरस्‍थळ) व खटकाळी बायपास येथे एकतर्फी रस्‍त्‍यावर बाजार भरणार आहे. शहरातील मुख्य भाजी मंडई मात्र बंदच राहणार आहे. तसेच मेराजुलूम परिसर, चिमणी बाजार, केमिस्ट भवन समोर,  पोळा मारोती चौकातही बाजार भरणार नाही. 

वाहनाऐवजी पायी चालत यावे

नागरिकांनी पाजीपाला खरेदीसाठी वाहनाऐवजी पायी चालत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांत सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क, रुमालाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळावे

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात कोणीही घराबाहेर जाण्याचे टाळावे, दुचाकी, चारचाकी वाहनाचा वापर करू नका, जीवनावश्यक वस्‍तू घरपोच पुरविणाऱ्या आस्‍थापनाकडे मागणी करून सामान घरीच बोलवा, अशा सूचना गुरुवारी (ता. नऊ) लाऊडस्‍पीकरवरून नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन

सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. तसेच संचारबंदी, जमावबंदीचे आदेश आहेत. बाजारात औषधी दुकानांशिवाय इतर दुकाने बंद आहेत. मात्र, या बंदच्या काळात जीवनावश्यक वस्‍तू घरपोच पुरविणारी अनेक दुकाने आहेत. त्‍यांच्याकडे संपर्क करून त्या वस्‍तू घरपोच मागणी करा. परंतु, बाजारात कोणीही अनावश्यक फिरू नका, अशा सूचना नगरपालिका प्रशासनातर्फे दिल्या जात आहेत. 

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे

ऑटोरिक्षावर लाऊडस्‍पीकर लावून गुरुवारी शहरातील प्रत्‍येक प्रभागात या बाबत माहिती दिली जात होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला जात होता. किराणा, मेडिकल, भाजीपाल्यासाठी बाहेर पडू नका, घरपोच सुविधा उपलब्ध आहे. २४ तास अगोदर संबंधिताला फोन करून नोंद करावी.

सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य 

 व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर ग्राहकांमध्ये किमान एक मीटर सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचनाही दिल्या जात आहेत. अत्यावश्यक व अपरिहार्य परिस्थितीत आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४५६- २२२५६० अथवा मोफत टोल फ्री क्रमांक १०० वर संपर्क करावा, असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com