औरंगाबाद - दोन महिन्यांपासून मुलीच्या लग्नाची लगबग सुरू झाली. लग्नघटिका जवळ आली. सोमवारी (ता. 17) एका लॉन्समधील लग्नस्थळी सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार जमला; पण त्याच घटिकेला मुलीच्या पित्याने घरात आत्महत्या केली. मुलीला हे दुःख सहन होणार नाही आणि लग्नावर विरजण पडू नये म्हणून मुलीचे लग्न दुपारी लावून सासरी पाठविण्यात आले.
औरंगाबादेतील म्हाडा कॉलनीत ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी घडली. मनजित रायभान कोळेकर (वय 45, रा. म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी मयूरी हिचा महानोर परिवारातील साजन या तरुणासोबत विवाह ठरून 17 डिसेंबर ही तारीख निश्चित झाली. त्यानुसार, कुटुंबीयांकडून विवाहाची जोरदार तयारी झाली. अंबिका लॉन्स आडगाव बु., बीड रोड झाल्टा फाटा येथे मयूरीचे सोमवारी 12.10 वाजता लग्न असल्याने पाहुणे मंडळी, आप्तेष्ट लग्नस्थळी पोचले; पण वधुपिता असलेले मनजित कोळेकर न आल्याने त्यांच्याबाबत विचारणा झाली; परंतु इकडे त्यांनी अकराच्या सुमारास घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
वऱ्हाडींना पाठवले; पण...
मनजित कोळेकर यांनी लग्नाला चला, असे म्हाडा कॉलनीत सर्वांना सांगत लग्नाला पाठविले. त्यानंतर घरी व गल्लीतही कुणी राहिले नाही. यानंतर त्यांनी घरात आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने मित्राला पप्पा आले नाहीत अजून, घरी बघ, असे सांगितले. मित्र घरी गेला, त्यावेळी कोळेकर यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.
सर्वांना सॉरी...देहदान करा...
मृत्यूपूर्वी कोळेकर यांनी चिठ्ठी लिहिली. माझ्या पत्नीने माझ्या इच्छा पूर्ण केल्या. आता शेवटची इच्छा देहदानाची असून ती पूर्ण करावी, असे सांगून "सॉरी ऑल ऑफ यू' असे चिठ्ठीत नमूद आहे.
|