गणित- विज्ञान विषयाच्या भावी गुरुजींना प्रतिक्षा - कशाची ते वाचा 

file photo
file photo

नांदेड : जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती केली. पात्रधारकाअभावी प्राथमिक विभागाच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी गणित, विज्ञान विषय शिक्षकांची दोन हजार ३९० पदे रिक्त आहेत. शासनाने ठरविलेले शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी धोरणात बदल करून बारावी विज्ञान शाखेच्या डीएड, बीएडच्या उमेदवारांना संधी देण्याची मागणी होत आहे.

बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरून जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासन स्तरावरून राज्यातील नऊ हजार रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली. मात्र, ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्राथमिकच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या गणित, विज्ञान विषयाच्या एकूण अडीच हजार रिक्त पदांसाठी केवळ ११० पात्र उमेदवारांनी अर्ज भरले. पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या शिक्षक भरतीमुळे भाषा, सामाजिकशास्त्र विषयांचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला; पण सहावी ते आठवी इयत्तेला गणित, विज्ञान शिकविण्यासाठी शासनाने ठरवलेल्या बी. एस्सी. डीएड, बीएड टीईटी - दोन असे पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

धोरणात्मक बदल करुन संधी हवी -
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवी वर्गांच्या गणित - विज्ञान विषय शिकविण्यासाठी रिक्त पदांच्या तुलनेत बी.एस्सी डीएड, बीएड, टीईटी - दोन पात्रतेच्या केवळ ११० उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे राज्यात ठरविलेले उमेदवार उपलब्ध नाहीत, त्यामुळे दोन हजार ३९० पदे रिक्त आहेत. संभाव्य काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी बारावी विज्ञान व टीईटी - दोन या उमेदवारांना रिक्त पदांवर संधी मिळावी अशी माफक अपेक्षा अभियोक्त्यांकडून व्यक्त होत आहे. 

अंमलबजावणी व्हावी
शासन निर्णय २०१६ व मानव संसाधन भारत सरकारचे २०१७ च्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने बारावी विज्ञान शाखेतून रिक्त जागा भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी अभियोक्ताधारकांतून होत आहे. या शिवाय शिक्षणसेवक कालावधीत बी. एस्सी. पूर्ण करण्याच्या अटीवर शिक्षक भरती करण्यात यावी, या मागणीनुसार आमदार कपिल पाटील, माधव पाटील जवळगावकर यांनी रिक्त पदे भरण्यासाठी धोरणात बदल करून भरतीचे संकेत दिले आहेत.

रिक्त भरणे अवश्यक -
पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये लॉगिन केलेल्या राज्यभरातील एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांमधून उमेदवार मिळाले नसल्याने दोन हजार ३९० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मग या जागा रिक्त ठेवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने बारावी विज्ञान व टीईटी - दोन उमेदवारांची निवड करून रिक्त पदे भरावीत.
- महेश महाजन, अभियोक्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com