सापांना वाचविण्यासाठी पुढाकाराची गरज

सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात
Nag panchami 2022 Save Snakes
Nag panchami 2022 Save Snakes

टाकरवण : साप किंवा नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण सोमवारानंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र, आता फक्त सापांची पूजा करूनच चालणार नाही, तर सापांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे.

शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. मात्र, सर्पमित्र साप संवर्धनासाठी मोठी मेहनत घेत आहेत. अनेक नागरिक साप निघाल्यानंतर तत्काळ सर्पमित्रांना फोन करून बोलावीत असल्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळत आहे. असे असले तरी आजही अनेक ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते.

पण, सापांचे असणारे महत्त्व लक्षात घेता आज प्रशासनाने व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापांचे निसर्गातील असलेले महत्त्व, सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथम उपचार यासाठी वनविभागाकडून जनजागृती करण्याची गरज आहे.

शासनाकडून सर्पमित्र दुर्लक्षितच

वास्तविक वन्य जीव संवर्धनाची जबाबदारी वन विभागाची असते; परंतु सापांच्या संरक्षणाच्या बाबतीत हा विभाग उदासीन दिसून येतो. सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून साप पकडतात. पकडलेल्या सापांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता त्या सापांना सुरक्षित स्थळी सोडले जाते. मिळेल तो मोबदला घेत सापांच्या प्रति असलेल्या प्रेमापोटी ही मंडळी रात्रंदिवस साप वाचविण्याचे काम करतात. वन्य जीव संवर्धनावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार मात्र या सर्पमित्रांना दुर्लक्षितच ठेवत आहे. अनेक सर्पमित्रांना साप पकडण्याचा अधिकृत परवाना दिला जातो, मात्र त्यासाठी लागणारी कुठलेही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत.

पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. कधी- कधी मनुष्याच्या चुकीमुळे प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते. पावसाच्या दिवसांत वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी बाहेर येतात. या दिवसांत मुख्यतः साप बाहेर निघतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे सापाला इजा न करता वन विभाग किंवा सर्प मित्रांना सूचना द्यावी.

-दीपक वाघमारे, सर्पमित्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com