नांदेडला ‘यांनी’ दिला सामुहिक आत्मदहनाचा इशारा, कोणी ते वाचा...

नांदेडला नगररचना कार्यालयात गर्दी
नांदेडला नगररचना कार्यालयात गर्दी

नांदेड - नांदेड शहर प्रस्तावित आरक्षण आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी  शहरातील आरक्षण पीडितांनी स्टेडीयम परिसरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे असलेल्या नगररचना कार्यालयात उपसंचालक रजा खान यांची सोमवारी भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रस्तावित आरक्षण आरखडा रद्द झाला नाही तर सामुहिक आत्मदहन करू इशारा दिला आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी (ता. १९) फेब्रुवारी रोजी नांदेड शहर प्रस्तावित आरक्षण आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. यात उपस्थित सर्व आमदारांनी आरक्षण आराखड्यास विरोध केला. आरक्षण आराखडा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यास एक महिना झाला तरी देखील काहीच हालचाली झाल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा नागरिकांनी जमा होऊन इशारा दिला आहे. 

सामूहिक आत्मदहनाचा इशारा 
पालकमंत्र्यांनी बैठकीत गुंठेवारी झालेली शेतजमीन व प्लॉट, अकृषिक परवाना असलेली शेतजमीन व प्लॉट, वस्ती, घरे मोक्याच्या जागा, एकाच व्यक्तीची संपूर्ण जमीन, एकाच गटातून रस्ता यावर आरक्षण टाकू नये. वरील शेतजमीन व प्लॉट, घरे व वस्ती आरक्षण आराखड्यातून तत्काळ वगळण्यात याव्यात व विकास आराखड्याचा संपूर्ण पुनर्विचार करा, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश नगररचना विभागप्रमुख रजा खान यांना दिले. तसेच जिल्हाधिकारी, महापालिका व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक गटावर जाऊन शेतजमीन व प्लॉट यांची प्रत्यक्ष पाहणी करावी व त्यांचे फोटो काढावेत, जेणेकरून सामान्य नागरिकांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले. पालकमंत्र्यांची बैठक होऊन एक महिना झाला आहे. या संदर्भात स्टेडीयम परिसरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे असलेल्या नगररचना विभागाच्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे आरक्षणबाधित प्लॉट व शेतजमीनधारक हवालदिल झाला आहेत. त्यामुळे संतापून आरक्षण पीडित नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा नगररचना प्रमुख रझा खान यांना दिला आहे.

शेतकरी, प्लॉटधारक संतप्त 
सामान्य नागरिकांनी नोकरीतून व व्यवसायातून एक-एक रुपया जमा करून तसेच पत्नीचे दागिने विकून आणि बॅंकेकडून कर्ज काढून खाजगी बाजार भावाने गुंठेवारी, अकृषिक प्लॉटची खरेदी केलेली आहे. तसेच सर्व प्लॉट धारकांनी महानगरपालिकेकडे प्लॉटची रितसर नोंदणी केलेली आहे व महानगरपालिकेने त्यांना घर क्रमांकसुद्धा दिलेला आहे. त्याच घर क्रमांकवर प्लॉट धारक दरवर्षी रितसर करही भरत आहेत. याच प्लॉट वरती नगररचना विभाग यांनी आरक्षण दर्शविले आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी व प्लॉटधारक यांनी नगररचना विभागाचे श्री. खान यांना प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडले. यावेळी प्लॉट व शेतजमीनधारक महिला यांनी आपल्या तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या.
लवकरात लवकर आमचा प्लॉट व शेतजमीन आरक्षण आराखड्यातून वगळले नाही, तर नगररचना कार्यालयापुढेच आरक्षण पीडित नागरिक सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा दिला.

किती दिवस चालणार प्रक्रिया
नांदेड वाघाळा महापालिका आर्थिक संकटात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षण आराखडा तयार करणे, हे कितपत उचित आहे, असा प्रश्न शेतकरी व प्लॉटधारक विचारत आहेत. मागील सप्टेंबर २०१९ पासून सुरू झालेली आरक्षण आराखड्याची प्रक्रिया अजून किती दिवस चालणार आहे आणि यात सामान्य नागरिकांचा काय दोष? त्यांना आज विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आपले दैनंदिन काम सोडून आरक्षण पिढीत नागरिक नगररचना विभाग, महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय येथे हेलपाटे मारत आहेत. त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. यास जबाबदार कोण? आरक्षण पीडित नागरिकांना न्याय केव्हा मिळणार? आदी प्रकारचे प्रश्न आज त्यांच्यासमोर उभे टाकले आहेत. त्यामुळे त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com