परभणीतील उपाययोजनांचा पालकमंत्री नवाब मलिक घेताहेत दररोज आढावा

malik
malik

परभणी ः ‘कोरोना’ विषाणू प्रादुर्भावानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे सातत्याने जिल्ह्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अगदी सकाळ - संध्याकाळ जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील माहिती ते स्वतः घेत आहेत. संशयित रुग्णांची परिस्थिती, धान्य वितरण, कायदा व सुव्यवस्था तसेच निवाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांची दखलदेखील पालकमंत्र्यांकडून घेतली जात आहे.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात लॉकडाउन करण्याची वेळ आली. त्या आधी ता.२२ मार्च रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या वेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना विषाणू संसर्ग काक्षाची पाहणीदेखील केली होती. त्याच बरोबर संशयित रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशीदेखील केली होती. 

उपाययोजनांवर लक्ष
पालकमंत्री नवाब मलिक हे सातत्याने जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे. परभणी जिल्ह्यात पहिला लॉकडाउन संपेपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, गुरुवारी (ता. १६) परजिल्ह्यातील एक कोरोनाबाधित रुग्ण परभणीत आल्याने परभणी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांवर स्वतः पालकमंत्री नवाब मलिक हे लक्ष ठेवून आहेत. ते सर्वती खबरदारी घेत आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना फोन सुरू आहेत. जिल्ह्यातील एकंदरच परिस्थितीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे पालकमंत्र्यांसह राज्यशासनाला देत आहेत.

सूचनांचा जिल्हाधिकारीदेखील करतायेत पाठपुरावा
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी, या दृष्टीने ही पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या आहेत. या सूचनांचा जिल्हाधिकारीदेखील तितक्याच काळजीने पाठपुरावा करीत आहेत.

कधी फोन, तर कधी व्हिडिओ कॉन्फरन्स
पालकमंत्री नवाब मलिक हे सातत्याने परभणी जिल्ह्याच्या संपर्कात आहेत. ते कधी फोनद्वारे, तर कधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशीदेखील ते बोलत असून उपाययोजनांसंदर्भात त्यांच्याकडूनदेखील आढावा घेत आहेत.


पालकमंत्री दररोज संपर्कात
पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्यातील उपाययोजनांच्या बाबतीत सतत आमच्या संपर्कात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, आरोग्य विभागातील रुग्णांची संख्या, धान्य वाटपाबाबत ते गांभीर्याने विचारपूस करून मार्गदर्शक सूचना करीत असतात. दिवसातून दोन वेळा त्यांचा मला फोन असतो. - दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com