अविश्वासाचा विजय ! राज्यात पहिल्यांदाच अविश्वास ठरावावर सार्वत्रिक मतदान

अविश्वासाचा विजय ! राज्यात पहिल्यांदाच अविश्वास ठरावावर सार्वत्रिक मतदान

बोरोळ (जि. लातूर): थेट जनतेतून होणारी सरपंचपदाची निवड नव्या सरकारने रद्द केली असली, तरी पूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या या परंपरेचे पडसाद अख्ख्या गावाला भोगावे लागत आहेत. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांवरील अविश्वास ठरावावर जनतेतूनच मतदान घ्यावे लागते. राज्यात बोरोळ (ता. देवणी) येथे थेट जनतेतून परंतु मतदान न होता बिनविरोध निवडून आलेल्या महिला सरपंच ऍड. जयश्री पाटील यांच्याविरुद्ध सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मात्र प्रशासनाला मतदान घ्यावे लागले. सोमवारी (ता.दहा) दिवसभर मतदान झाल्यानंतर रात्री उशिरा मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने मोठ्या संख्येने मतदान झाल्याने बोरोळमध्ये अविश्वास जिंकला आहे.


सोमवारी 881 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये अविश्वास ठरावच्या बाजूने 723, तर विरोधात 83 मते पडली. 75 मते बाद ठरली. यामुळे सरपंच पाटील यांना पायउतार व्हावे लागणार आहे. गावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून ऍड. पाटील दोन वर्षांपूर्वी थेट जनतेतून मात्र, विरोधात कोणाही अर्ज न भरल्याने बिनविरोध निवडून आल्या. मात्र त्यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसोबत जमले नाही. यामुळे उपसरपंचांसह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. पूर्वी अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तहसीलदार सदस्यांचे मतदान घ्यायचे. सदस्यांचे मतदान घेऊन बहुमताचा निर्णय होत असे; मात्र थेट जनतेतून सरपंचांसाठी करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सुधारणा कायदा 2017 नुसार त्यात बदल झाला. सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला तरी तो ग्रामसभेत ठेवून जनतेचीच मंजुरी घेणे बंधनकारक झाले.

त्यानुसार येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी मतदानाची तयारी करण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने म्हणजे समर्थनार्थ मतदानासाठी वर्तुळ, तर विरोधासाठी त्रिकोण चिन्ह देण्यात आले. सरपंच व त्यांच्या विरोधी गटाकडून मतदानासाठी जोरदार प्रचार झाला. सोमवारी सकाळी ग्रामसभेला सुरवात झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करून गणपूर्तीची खात्री करून घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ करण्यात आला. साडेदहा ते साडेतीन यावेळेत मतदान प्रकिया पार पडणार होती; मात्र एकच मतदान केंद्र असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. अध्यासी अधिकारी म्हणून अच्युत पाटील यांनी काम पाहिले, तर इतर पंधरा कर्मचाऱ्यांनी त्यांना साहाय्य केले. निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी भेट देत आवश्‍यक सूचना केल्या.


अन्‌ ठरवून मतदान
करण्याची परंपरा कायम

मतमोजणीस प्रारंभ होताच अविश्वास ठराव मंजूर होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. मतदारांचा कौल निश्‍चित कोणाला आहे, हे लक्षात आल्याने निकाल घोषित होण्याआधीच आतषबाजी करीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करायला सुरवात केली. त्यामुळे मतदान प्रक्रिया ही केवळ औपचारिकताच होती की काय? असा प्रश्न उपस्थितांच्या मनात डोकावून गेला व पुन्हा एकदा ठरवूनच मतदान करण्याची परंपरा कायम राखण्याचा मान बोरोळकरांनी यावेळीही राखला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com