बापरे..! विहीर गेली चोरीला; शेतकऱ्याला पोलिस कोठडी

photo
photo

हिंगोली ः येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) येथील एका शेतकऱ्याला विहीर नसताना चार हजार युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. यावरून शेतकऱ्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीची हवाही खावी लागली. ही घटना २०१८ मध्ये घडल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चार्जसीट मिळाली. आता ही विहीर शोधून द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या बाबत शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. श्री. सोळंके यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सप्टेंबर (ता.२८) २०१८ मध्ये ते कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. या वेळी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता आश्विनकुमार मेश्राम व वरिष्‍ठ तंत्रज्ञ अमोल थोरात यांनी विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी अनधिकृत वीजचोरी केल्याप्रकरणी श्री. सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल केला.

चार हजार २८ युनिटच्या चोरीचा आरोप

गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. सोळंके यांनी शेतात विहीर नसल्याचे वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, त्‍यांचे म्‍हणणे एकून न घेता श्री. मेश्राम यांनी साक्षीदार शेख नजीर शेख वजीर, तातेराव चौरंगे यांच्या समक्ष पंचनाम करीत जुन्या विहिरीवर वीजचोरी करून चार हजार २८ युनिटची चोरी केल्याचे दाखविले. तसेच ७१ हजार ७८० रुपये वीजचोरीप्रकरणी दंड लावण्यात आला. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विहिरीचे फोटोदेखील काढल्याचा उल्‍लेख पंचनाम्यात आहे.

दोन दिवस पोलिस कोठडी

वास्‍तविक २०१८ मध्ये शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके याच्या शेतात विहीर नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकरणी वसमत न्यायालयात महावितरण कंपनीने चार्जशिट दाखल केल्यानंतर श्री. सोळंके यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. शेतकरी श्री. सोळंके यांना महाराष्‍ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत (ता. एक) जानेवारी २०१९ मध्ये मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.

जुनी विहीर असल्याचा दावा

तत्‍पूवी जुनी विहीर असल्याचा दावा महावितरण कंपनी करीत आहे. त्‍यामुळे श्री. सोळंके यांनी ज्या विहिरीमुळे त्‍यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला, ती विहीर आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शोधून द्यावी, अन्यथा आत्‍महत्या करण्याचा इशारा श्री. सोळंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

थकबाकी वसुली मोहीम जोरात

जिल्हाभरात अनेक ठिकाणी वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

आठ दिवसांपूर्वी चार्जसीट मिळाली

ही घटना २०१८ मध्ये घडल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये (ता. चार) गुन्हा दखल झाला. त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेले. चार्जसीट मिळण्यासाठी बराच कलावधी लागला. आठ दिवसांपूर्वी चार्जसीट मिळाल्यानंतर जिल्‍हाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता. सहा) निवेदन दिले आहे.
-ज्ञानेश्वर सोळंके, शेतकरी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com