राज्यातील दीड लाख जलस्त्रोतांची तपासणीच नाही, कोरोना ठरला अडसर

Water Issue News Latur News
Water Issue News Latur News

लातूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणात राज्यातील सर्वच सार्वजनिक जलस्त्रोतांच्या पाण्याचे नमुने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून तपासून दिले जातात. पण या वर्षी या तपासणीला कोरोनाचा मोठा अडसर आला आहे. मे अखेरपर्यंत राज्यातील दोन लाख जलस्त्रोतांपैकी केवळ ६२ हजार जलस्त्रोताच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे गेले आहेत. म्हणजे राज्यातील दीड लाख जलस्त्रोताच्या पाण्याच्या नमुन्यांची गुणवत्तेच्या आधारावर तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक मराठवाड्यातील ६३ हजार पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

गुणवत्तेसाठी पाण्याची तपासणी
राज्यातील प्रत्येक सार्वजनिक जलस्त्रोताच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेकडून करून दिली जात जाते. या पाणी नमुन्यांची रासायनिक आणि अणुजैविक तपासणी केली जाते. पाण्याच्या गुणवत्तेसाठी ही तपासणी अत्यंत महत्वाची असते. दरवर्षी मेपर्यंत ही तपासणी करून दिली जाते. या तपासणीनंतर गाव पातळीवर पाणी गुणवत्तेसाठी उपाय योजना केल्या जातात.
कोरोनामुक्तीची उदगीरकरांना पुन्हा हुलकावणी, आठवड्यात झाले सतरा रुग्ण


मराठवाड्याची कामगिरी असमाधानकारक
राज्यात एप्रिल आणि मेमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी होते. पण यावर्षी मार्चपासूनच कोरोनाचा लॉकडाऊऩ सुरु झाला. याचा मोठा अडसर आला. राज्यातील दोन लाख १२ हजार ६४२ जलस्त्रोत आहेत. मेअखेरपर्यंत या नमुन्यांपैकी केवळ ६२ हजार ४८२ पाण्याचेच नमुने प्रयोगशाळेपर्यंत जावू शकले आहेत. त्याचीच तपासणी करण्यात आली आहे. दीड लाख पाणी नमुन्यांची तपासणीच झालेली नाही. यात मराठवाड्याची कामगिरी असमाधानकारक राहिली आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक ६३ हजार पाणी नमुन्यांची तपासणी होऊ शकलेली नाही.

संचालकांचे सीईओंना पत्र
राज्यातील जलस्त्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी अत्यंत कमी झाली आहे. पाण्याची गुणवत्ता तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) नुकतेच पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. वाड्या वस्त्यावरील जलस्त्रोतांसह सर्वच स्त्रोतांचे पाण्याचे नमुने तातडीने गोळा करून ते प्रयोगशाळेकडे पाठवावेत अशी सूचना त्यांनी केली आहे.


राज्यातील सार्वजनिक जलस्त्रोताच्या पाण्याच्या नमुन्यांची मान्सूनपूर्व म्हणजे मेपर्यंत तपासणी करून घेतली जाते. पण यावर्षी कोरोनामुळे अत्यंत कमी नमुन्यांची तपासणी झाली आहे. काही नमुने गोळा झाले पणर प्रयोगशाळेकडेही आलेले नाहीत. त्यामुळे जूनअखेरपर्यंत हे पाणी नमुने गोळा करून त्याची तपासणी करून घ्यावी असे पत्र देण्यात आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने हे तपासणी महत्वाची आहे.
- कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com