‘त्या’ पंधरा दिवसांत देव पाहिला अन्‌ अनुभवलाही...

file photo
file photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : डॉक्टर्सने तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगताच पुरता घाबरून गेलो... तत्काळ उपचार सुरू झाले... कुटुंबातील सदस्य, नातेवाइकांनाही तपासणीला बोलाविल्याने मन सुन्न झाले; मात्र डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांकडून झालेले योग्य उपचार अन्‌ आरोग्य विभागाकडून मिळालेले प्रोत्साहन प्रभावी औषधीएवढेच गुणकारी ठरले... त्यामुळेच मला नवजीवन मिळाले... वास्तविकत: त्या पंधरा दिवसांत डॉक्टर्स, रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांतील देव पाहिला अन्‌ अनुभवलाही... हे बोल आहेत एका कोरोनामुक्त योद्ध्याचे.

कोरोना संसर्ग हा विशिष्ट धर्म, पंथातील लोकांनाच होतो असे नव्हे. कुठलीही लक्षणे नसताना या जीवघेण्या आजाराने मला ग्रासल्याने हे आव्हान स्वीकारत धैर्याने सामोरे गेलो. डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे हे नवजीवन मिळाले. या देवदूतांमुळेच सुदैवाने कोरोनातून मुक्त झालो. अशा जीवघेण्या आजाराचा संसर्ग कुणाच्या नशिबी येऊ नये, त्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करीत स्वतःबरोबरच कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन कोरोनाच्या विळख्यातून योग्य उपचाराने बचावलेल्या रसूल (नाव बदलले आहे.) यांनी केले आहे.

शहरातील रुग्णालयात उमरगा व लोहारा तालुक्यांतील तीन कोरोनाबाधित रुग्ण यशस्वी उपचारानंतर सुखरूप घरी परतले आहेत. तिघांचा अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी (ता. २०) डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील एका रुग्णाशी संवाद साधला असता त्याने पंधरा दिवसांत आलेले अनुभव कथन केले. तो म्हणाला, की परराज्यातून गावाकडे परतलो तेव्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती सुरू होती.

गावात परतलो त्याच दिवशी एका डॉक्टर मित्राला फोन केला. त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली. कोरोना आजारासंदर्भातील कुठलीही लक्षणे नव्हती; मात्र मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतंत्र खोलीत आठ दिवस विलगीकरणात होतो. दरम्यान, परराज्यातून आलेल्या व्यक्तींची तपासणी मोहीम सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णालयात तपासणीसाठी नेत स्वॅब घेतला.

दुसऱ्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास स्वतंत्र खोलीत नेण्यात आले असता मनात संशयाची पाल चुकचुकली. थोड्यावेळाने तर डॉक्टर्सने तुमचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगताच पुरता घाबरून गेलो. तत्काळ उपचार सुरू झाले. कुटुंबातील सदस्य, नातेवाइकांनाही तपासणीला बोलाविल्याने मन सुन्न झाले; पण आरोग्य विभागातील प्रत्येकाकडून सुरू असलेले प्रयत्न पाहून मलाही धीर मिळाला.

मला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या देवदूतांना पाहून उपचाराला प्रतिसाद देत आपण जे करतोय ते आपल्या कुटुंबासाठी करतेय, याची जाणीव झाली. नातेवाइकांची दुबार चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मनातील शंका-कुशंका दूर सारत सकारात्मकता वाढली. माझीही शेवटची चाचणी निगेटिव्ह येईल, यासाठी देवाकडे प्रार्थना केली. वास्तविकत: त्या पंधरा दिवस डॉक्टर्स, रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांतील देव पाहिला अन्‌ अनुभवलाही. या देवदूतांनी केलेले नियमित उपचार, तब्येतीची क्षणाक्षणाला आस्थेने केलेली विचारपूस आम्हाला बळ देणारी ठरली. माझ्यासोबत दाखल झालेल्या अन्य दोघांची स्वतंत्र खोलीत व्यवस्था होती. आम्ही तिघे एकमेकांच्या संपर्कात आलो नाही. नाश्‍ता, जेवण अन्‌ औषधे घेण्याचा निरोप यायचा, त्यावेळी लांबूनच एकमेकांची विचारपूस करीत होतो. 

प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक कमीच 
शासन, प्रशासनाने आम्हा बाधितांसाठी केलेली सोय अतिशय चांगली होती. हा आजार नवीन असल्याने पहिले एक-दोन दिवस सुरळीतपणा आला नव्हता; पण त्यानंतर मात्र मला आरोग्य विभागाकडून मिळालेले प्रोत्साहन रोगमुक्तीच्या औषधीएवढेच गुणकारी ठरले. त्यामुळेच मला नवजीवन मिळाले. तहसीलदार, वरिष्ठ डॉक्टर्स फोनद्वारे तब्येतीची चौकशी करीत होते.

रुग्णालयातून परतताना झालेले स्वागत आयुष्यात कधीही विसरणार नाही. रोगमुक्तीचा अहवाल आला असला, तरी आणखी पंधरा दिवस कुटुंबाशी जवळचा संपर्क कटाक्षाने टाळत आहे. कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. नागरिकांनी प्रशासनाचा सल्ला ऐकायला हवा. तरच आपण सारे कोरोनाविरुद्धचा लढा जिंकू, असा आशावाद रसूल यांनी व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com