बियाणेच सदोष, शेतकऱ्यांना प्रतिएकरी पाच हजार रुपये द्या

आमदार राणाजगजितसिंह पाटील
आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद : सोयाबीनचे बियाणेच सदोष असल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. निसर्गाच्या दुष्ट चक्राचा कायम सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने प्रतिएकरी पाच हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, खरिप हंगामात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा केला जातो. अनेक वर्षांनंतर जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरवात झाली होती.

ओल चांगली असूनही पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात हिच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. कृषी विद्यापीठाकडे चाचणीसाठी दिलेल्या बियाणापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक बियाणे उगवण क्षमतेबाबत समाधानकारक नाहीत, असे निदर्शनास आल्याचे समजते. सदोष बियाणाचे कारण हे प्रामुख्याने गतवर्षी काढणीच्या वेळेस झालेला अवकाळी पाऊस हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असल्यास दुबार पेरणीनंतर अशा बियाणांची उगवण व वाढ कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

मागील खरीप हंगामामध्ये प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे झालेले नुकसान व लॉकडाऊनमुळे शेतमालाला न मिळालेला योग्य भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यातच सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात निकृष्ट असल्यामुळे उगवण क्षमतेत झालेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीच्या अधिकच्या होणाऱ्या खर्चाबरोबरच सदोष बियाण्यांमुळे सोयाबीन पिकाची या हंगामात उगवण, वाढ व उत्पादन काय होणार, याबाबत शेतकरी चिंतेत आहे.

या सर्व गंभीर बाबींचा विचार करून दुबार पेरणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना (घरगुती बियाणे वापरणाऱ्यासह) प्रतिएकरी पाच हजार रुपये मदत द्यावी, बियाणाच्या गुणवत्तेबाबत असलेल्या व्यापक सांशकतेचा विचार करता कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण चाचणीतून मिळालेली माहिती जनतेसमोर मांडावी, या खरीप हंगामात सोयाबीन पिकाबाबत सर्व बाबींचा विचार करून शासनाने धोरण जाहीर करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com