तुळजाभवानी मंदिर समिती हजारो कुटुंबांना करणार मदत

आमदार राणाजगजितसिंह पाटील
आमदार राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्‌भवलेल्या अभूतपूर्व संकटातून सावरण्यासाठी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर समिती आणि जिल्हा परिषदेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १५ हजार गरजू कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिर समितीच्या माध्यमातून पाच हजार तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १० हजार जीवनाश्यक वस्तूंच्या संचांचे वाटप केले जाणार आहे. हातावर पोट असणारे मजूर, निराधार आणि गोरगरिबांना तुळजाभवानी मंदिर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा आधार मिळणार आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली असून, शेतमाल विकला जात नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शहरातील बांधकाम व अन्य लहान-मोठे व्यवसाय बंद पडल्याने मजुरांचेही हाल होत आहेत.

अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांना दोनवेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजूंना १५ हजार जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यात गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व नागरिकही गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहेत. तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच हजार जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पाच हजार जीवनावश्यक वस्तूंचे संच वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे.

मंदिर समितीच्या अध्यक्ष, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या मान्यतेने आवश्यक साहित्याची खरेदी प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. 
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंचे १० हजार संच वाटप करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा झाली आहे. याबाबत तातडीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनाही याबाबत अवगत करण्यात आले आहे. यातून जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू १५ हजार कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध होणार आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे पाच हजार संच नागरी भागासाठी, तर जिल्हा परिषदेचे दहा हजार संच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचे नियोजित आहे.

ग्रामीण भागात कोरोना सहायता कक्ष व नागरी भागात तत्सम यंत्रणेचे यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी योग्य ते निकष लावून गरजू नागरिकांपर्यंत जलद गतीने मदत पोचविण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com