नागरिकांना घरपोच मिळतो भाजीपाला

उस्मानाबाद : नागरिकांना भाजीपाला घरपोच देताना महात्मा गांधीनगरातील गणेश मंडळाचे सदस्य.
उस्मानाबाद : नागरिकांना भाजीपाला घरपोच देताना महात्मा गांधीनगरातील गणेश मंडळाचे सदस्य.

उस्मानाबाद : शेतकरी ते ग्राहक असा स्तुत्य उपक्रम महात्मा गांधीनगरातील गणेश मंडळाच्या तरुणांकडून राबविण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून अनवधानाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील तरुणांनी शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम सुरू करीत नागरिकांची गैरसोय दूर केली आहे. नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभरामध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. यामध्ये भाजीपाला घेण्यासाठीच लोकांना जास्त घराबाहेर जावे लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे महात्मानगर येथील तरुणांनी एकत्र येऊन नागरिकांना घरपोच भाजीपाला देण्याची संकल्पना पुढे आणली.

ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरून भाजीपाला आहे त्या किंमतीत खरेदी करून तो या भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. पहिल्यांदा तरुणांनी मिळून पैसे जमा करून ज्या ठिकाणी भाजीपाला मिळतो अशा गावात जाऊन शेतकऱ्यांकडून माल विकत घेण्यास सुरवात केली. हा भाजीपाला त्या त्या भागात एका ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतो.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

नागरिकांना तिथे येऊन खरेदी करता येईल, तसेच खरेदी करण्यासाठी वेळही राखीव ठेवण्यात आला. सकाळी दहा ते बारापर्यंत ही सोय केली आहे. ज्या नागरिकांना तेथे येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी वाहनातून त्यांच्या दरवाजासमोर ही भाजी खरेदी करण्याचीही सोय उपलब्ध आहे. दुपारी बारा ते दोन या कालावधीमध्ये हे वाहन गल्लोगल्ली फिरत असते. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बाहेरचा कोणताही विक्रेता गल्लीमध्ये येऊ नये एवढा एकच हेतू असल्याचे या तरुणांनी सांगितले. सगळ्या तरुणांचे स्वतःचे व्यवसाय असून, सध्या ते बंद आहेत.

सामाजिक दायित्व म्हणून हे काम त्यांनी हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या भावातच ग्राहकांनाही भाजीपाला उपलब्ध होत असल्याने दोन्ही घटकांना आर्थिकदृष्ट्याही ते परवडत आहे. पंकज जाधव, प्रवीण जाधव, किशोर जाधव, प्रशांत जाधव, विकी गायकवाड, कृष्णा डोके, समीर कोळी, सचिन कोळी या तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात आहे. साईराज तरुण गणेश मंडळातर्फे शेतकरी ते ग्राहक या सुविधेअंतर्गत अतिशय मुबलक किंमतीत ताजा भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. कोरोनापासून काळजी घेण्याचा हा प्रयत्न असून, लोकांनी गल्लीबाहेर जाऊ नये. विक्रेत्यांनी गल्लीमध्ये येऊ नये, यासाठी हे काम करीत आहोत. 
- प्रवीण जाधव, सदस्य, गणेश मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com