

Parbhani News
esakal
परभणी: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत, वाहतूक खर्च पूर्वीइतकाच आहे, तरी शेंगदाणा तेल अचानक १५ ते २० रूपयांनी महागले आणि सोयाबीन मुबलक असूनही तेलातील दराने उसळी घेतली. ज्वारी तर आठवडाभरात किलोमागे १० रूपयांनी महागली! खोबरेल तेल, तांदूळ, पोहे, भगरीसह बहुतांश किराणा मालाची दरवाढ झालेली आहे. आम्ही दरवाढ किंवा साठा केला नसल्याचे ठोक व्यापारी आणि व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे. पण ग्राहकांना तर जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. पॅकिंगच्या प्लॅस्टिकमधील दरवाढीचे कारण तर कुणालाही पटण्यासारखे नाही. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीच कृत्रिम टंचाई निर्माण करून नफेखोरी सुरू केल्याचा आरोप संतप्त गृहिणींमधून केला जात आहे. एकीकडे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलसाठी मध्यरात्री रांगा लावण्याची वेळ नागरिकांवर आली असताना आता जीवनावश्यक वस्तूही महागल्याने सर्वसामान्य जनता दुहेरी कोंडीत सापडली आहे.