Crop Insurance Scheme : दिवाळीत शेतकऱ्यांना आनंदाचा ‘मेसेज’; पीकविमा अग्रिमचे २०६ कोटी जमा

यंदाच्या खरीप हंगामात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत ‘आनंदाचा मेसेज’ आला.
crop insurance scheme
crop insurance schemesakal

परळी वैजनाथ - यंदाच्या खरीप हंगामात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत ‘आनंदाचा मेसेज’ आला. जिल्ह्यातील सहा लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे सोमवारी (ता. १३) २५ टक्के पीक विमा अग्रिमचे २०६ कोटी रुपये जमा झाले.

ज्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना नियमाप्रमाणे किमान एक हजार रुपये याप्रमाणे रक्कम मिळावी, असा नियम आहे. त्यामुळे उर्वरित एक लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ३५ कोटी रुपयांचे वाटपही लवकरच होणार आहे. यंदा खरीप हंगामाची सुरुवातच संकटात झाली. सुरुवातीला पावसाने ओढ दिली. नंतर कसाबसा पाऊस आला. मात्र, सोयाबीन शेंगा लागण्याच्या हंगामातच पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरिपातील सोयाबीनसह कपाशी, उडीद, मुग, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

मात्र, सोयाबीन पिकाला २५ टक्के पीक विमा अग्रिम मंजूर व्हावा, या मागणीने जोर धरला. प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी तीन अधिसूचनांद्वारे जिल्ह्यातील सर्वच ८६ महसूल मंडळांतील सोयाबीनला विमा अग्रिम मंजुरी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील सात लाख ७० हजार शेतकऱ्यांना होणार होता.

या विरोधात कंपनीने सुरुवातीला विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर आव्हान दिले. मात्र, विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना विमा अग्रिम लागू करण्याशिवाय कंपनीकडे कुठलाही पर्याय राहिला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवाळीत विमा अग्रिम रक्कम मिळेल, असे कृषीमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते.

कंपनीने शासनाकडे महाडीबीटीमार्फत वितरणासाठी विमा अग्रीमची २४१ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली होती. मात्र, बँकांना सुट्या असल्याने मागील तीन दिवस ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.

दिवाळीचा मुहूर्तही हुकतो की काय, अशी शंका आलेली असतानाच सोमवार (ता. १३) सकाळपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर विमा अग्रीमच्या रकमा पडल्याचे मेसेज धडकले. दरम्यान, सहा लाख ३४ हजार शेतकऱ्यांना २०६ कोटी रुपये वितरित झाले आहेत.

दिवाळीत २५ टक्के विमा अग्रीमची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, असा दिलेला शब्द पाळता आल्याचे समाधान आहे. अडचणीतल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत ठरली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही त्यांची रक्कम दोन दिवसांत मिळेल.

- धनंजय मुंडे, कृषीमंत्री तथा पालकमंत्री, बीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com