Jalna News : घनसावंगी-अंबडमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर; तोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल

घनसावंगी व अंबड तालुक्‍यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मार्च महिना उजाडला तरी उसाला तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
Problem of surplus sugarcane critical in Ghansawangi Farmers are desperate not getting harvest jalna
Problem of surplus sugarcane critical in Ghansawangi Farmers are desperate not getting harvest jalnaSakal

घनसावंगी : घनसावंगी व अंबड तालुक्‍यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मार्च महिना उजाडला तरी उसाला तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यातूनच घनसावंगी तालुक्‍यातील सर्वच भागातील हिरवा गार ऊस आता कडब्यासारखा दिसत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट निर्माण झाले आहे.

दुसरीकडे साखर आयुक्तांनी अंबड व घनसावंगी तालुक्‍यातील ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही यांची दक्षता घेऊन साखर कारखान्यांशी समन्वय ठेवून कार्यवाही करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांना दिले आहेत.

बारमाही हंगामात चाललेल्या विहिरी आता सात ते आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. यातच शेतकऱ्यांना ऊसतोड वेळेत मिळत नसल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत.

अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन, ऊसतोड करताना घामाघूम होणारे मजूर, गाळप क्षमतेपेक्षा जास्त उसाची नोंद, साखर कारखान्यांकडे असणारी अपुरी तोडणी यंत्रणा, काही मजुरांनी धरलेली गावाकडची वाट आणि अशातच साखर आयुक्तांकडून कारखाने अंदाजे १५ एप्रिलला बंद होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

मात्र घनसावंगी व अंबड तालुक्‍यामध्ये कारखान्याकडे क्षमतेपेक्षा जास्त नोंद व आदेश अशा दुहेरी कात्रीत साखर कारखानदार सापडले आहेत. उपलब्ध उसासाठी कारखाने सुरू ठेवण्यात येतीलही मात्र, ऊसतोडीसाठी मजूर आणायचे कोठून? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस अजूनही उभा आहे. वेळेत पाणी न मिळाल्याने आणि उन्हामुळे उसाच्या एकरी टनात घट येत आहे. त्यामुळे शेतकरी कारखान्यांच्या यंत्रणांकडे ऊसतोडीसाठी विनवण्या करत आहेत. जालना, जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड अन्य काही भागात ऊस क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे १५ एप्रिलनंतरही साखर कारखान्यांचे गाळप सुरू राहणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंद देऊनही सुधारित उसाच्या जातीचे बारा महिन्यात गाळप आवश्‍यक आहे. नाहीतर शेतकऱ्यांना एकरी दहा ते पाच टन नुकसान सहन करावे लागू शकते. शेतकऱ्यांनी कारखान्यांना रीतसर नोंद देऊनही अंबड व घनसावंगी तालुक्‍यात अतिरिक्त ऊस होतो कसा?

असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे साखर आयुक्तांनी अंबड व घनसावंगी तालुक्‍यातील ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेऊन कारखान्यांशी समन्वय ठेवून जास्तीत जास्त गाळप करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक सहसंचालक यांना दिले आहेत.

अंबड व घनसावंगी तालुक्‍यात साखर कारखाने असूनही सद्यःस्थितीत बारा ते पंधरा महिने होऊनही ऊसतोड मिळत नाही. कारखान्यांकडून ऊसतोड करण्यासाठी मजुरांची टंचाई असल्यामुळे गावागावांतील उसाचे क्षेत्र कमी झालेले नाही.

त्यामुळे उसाचे क्षेत्र संपल्याशिवाय कारखाने बंद करू नये अशी मागणी आम्ही साखर आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी अतिरिक्त उसाचे नियोजन करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सह संचालक यांना दिले आहेत. त्यामुळे कारखान्यांकडून तातडीने ऊस नेण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

- रामप्रसाद खरात, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस, घनसावंगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com