ट्रायल बेसवरील पाण्यामुळे केळी, उसासह रब्‍बीला लाभ

kalva
kalva

गिरगाव ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथून इसापूर व येलदरी धरणाचे दोन कालवे जातात. कालव्याच्या परिसरात गिरगावसह अनेक गावांतील एक हजार एकरच्या वर शेती सिंचनाखाली आहे. चार वर्षांपासून या दोन्ही कालव्यांना पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांची पिके अडचणीत होती. या वर्षी मात्र दोन्ही धरण भरल्याने त्‍याचे पाणी या भागातून जाणाऱ्या कालव्याला सध्या ट्रायल बेसवर सोडण्यात आले आहे. यामुळे केळी, ऊस, हळद या पिकांसह रब्‍बीच्या पिकांना लाभ होणार आहे.

वसमत तालुक्‍यातील गिरगावचा काही भाग व परजना, बोरगाव खुर्द, बोरगाव बुद्रुक, किन्होळा या गावांतून येलदरी धरणाचा कालवा जातो. तसेच गिरगाव, खाजमापूर वाडी, पार्डी बुद्रुक, सोमठाणा, डिग्रस खुर्द या गावांतून येलदरी धरणाचा कालवा जातो. यामुळे या गावातील एक हजार एकरच्या वर शेती सिंचनाखाली आली आहे. मात्र, मागच्या चार वर्षांपासून धरणाच्या लाभ क्षेत्रात पाणी नसल्याने कालव्यालादेखील पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्‍बीच्या पिकांसह, ऊस, केळी, हळद या पिकांना पाणी देता आले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ
मागच्या आठ दिवसांपूर्वी या भागातून जाणाऱ्या इसापूर धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात आले, तसेच मागच्या दोन दिवसांपूर्वी येलदरी धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून रब्‍बीच्या पिकांनादेखील शेतकऱ्यांना पाणी देता आले आहे. तसेच ऊस, केळी व हळद पिकांनादेखील त्‍याचा लाभ झाला आहे. या वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने इसापूर व येलदरी धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने या वर्षी धरणातून जाणाऱ्या कालव्याला पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा बाळगून गहू, हरभरा या पिकांचा पेर वाढविली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना उसाचे व केळीचे क्षेत्रदेखील वाढविल्याने या सर्व गावांत दहा हजार एकरच्या वर ही पिके आहेत.

पाणी पाळीचे अद्यापही नियोजन नाही
या दोन्ही धरणांच्या कालव्यातून सोडणाऱ्या पाणी पाळीचे मात्र अद्यापही नियोजन झालेले नाही. किती पाळ्या देणार आहेत व त्‍या कधी सुरू होणार? याकडे मात्र शेतकऱ्यांचे आता लक्ष लागले आहे. सध्या विहिरी व विंधन विहिरींना या भागात मुबलक पाणी असल्याने काही दिवसांनंतर शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने पाणी पाळ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


रब्‍बीसह ऊस, केळीचे क्षेत्र वाढविले
या भागातून जाणाऱ्या इसापूर व येलदरी धरणाच्या कालव्यात चार वर्षांनंतर यावर्षी पाणी आले आहे. ही दोन्ही धरणे भरल्याने शेतकऱ्यांनी रब्‍बीसह ऊस, केळीचे क्षेत्र वाढविले आहे. आता प्रशासनाने पाणी पाळ्यांचे नियोजन लावून त्याच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
-पुंडलिक नादरे, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com