जालना लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मित्रपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी बैठकांचा सपाट सुरू केला आहे. मात्र, या दुरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार रिंगणात असल्याने हा उमेदवार कुणाची मते खेचणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
या मतदारसंघातून महायुतीची जागाही पूर्वीपासून भाजपची असल्याने भाजपकडून पाचवेळा विजयी झालेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांचा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आघाडीत ही जागा कॉँग्रेसची असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून मागणी केल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जालन्याची जागा काँग्रेसकडे कायम राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसने २००९ मध्ये दानवे यांना कडवी लढत देणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली.
मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील स्थानिक पातळीवरील राजकीय विरोध दूर केल्यानंतरच विजयाला गवसणी घालणे शक्य होणार आहे. त्यात महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नाराजीचा सूर अधूनमधून निघत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जालन्याच्या जागेची मागणी केल्यानंतर लोकसभेसाठी इच्छुक काँग्रेसचे राज्य प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र ही जागा कॉँग्रसेलाच मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.
दुसरीकडे जालना मतदारसंघात ‘वंचित’कडून प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर केली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने तब्बल ७६ हजार ९२४ मते घेतली होती. त्यामुळे यंदाही ‘वंचित’चा उमेदवार किती मते खेचतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. हे काहीही असले रावसाहेब दानवे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये आधी आपल्या पक्षाला जागा मिळवणे व नंतर योग्य उमेदवाराचा शोध घेणे, हा घोळ घालण्याची परंपरा कॉँग्रेसने यंदाही जपली. त्यामुळे कॉँग्रेसचे कल्याण काळे यांना प्रचारास फारसा अवधी मिळालेला नाही.
ते २००९ च्या अनुभवाचा फायदा घेत चांगली लढत देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दानवे यांना मात्र पहिल्याच यादीत उमेदवारी जाहिर झाल्याने प्रचाराच्या अनेक फेऱ्या त्यांनी पूर्ण केल्या. त्यांच्याबाबतीत अँटिइन्कबन्सी, खोतकरांची नाराजी, मराठा, ओबीसी आरक्षणाचे भिजत घोंगडे व इतर कांही नकारात्मक मुद्दे असले तरीही महाविकास आघाडीने उमेदवार ठरविण्यात वाया घालवलेला वेळ दानवेंच्या पथ्थ्यावर पडू शकतो. शिवाय संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व पक्ष व प्रभावी नेत्यांसोबत त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबध हे वादातीत अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दानवे यांचा विजयी षटकार बसतो का किंवा त्यांची विकेट पडते का? या दोनच गोष्टींची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्ह्यातून मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर गाजल्याने या निवडणुकीत मराठा चेहरा म्हणून फुलंब्री विधानसभा मतदार संघातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी पहिला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला केला होता. तर दुसरीकडे भटके-विमुक्त, ओबीसी, बहुजन समितीकडून दीपक बोऱ्हाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी मतदारांच्या ‘गुगलीवर’ ही विजयाचा कौल अवलंबून राहणार आहे.
जालना, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर शहरातील पाणी प्रश्न
मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न
रखडलेला सिडको, सीड पार्क प्रकल्प
जालना शहराचा विस्तार होत असून झालर क्षेत्र अद्यापि विकसीत नाही.
रस्ते, पाणी या मुलभूत प्रश्न कायम.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.