गर्दी टाळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत करा नोंदणी

file photo
file photo

नांदेड : शासनाने घोषित केलेल्या हमीभावानूसार हरभरा खरेदीसाठी नाफेड मार्फत राज्य पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ व महाफार्मकडून जिल्ह्यात, एकंदर १५ सबएजंट संस्थांची/ शेतकरी उत्पादक कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत हरभरा खरेदीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह जिल्हा उपनिंबधक प्रविण फडणीस यांनी केले आहे. 

बाजारात हरभऱ्याचे दर पडले
सद्यस्थितीत शासनाने हरभऱ्याला प्रति क्विंटल घोषित केलेल्या चार हजार ८७५ रुपये हमी भावापेक्षा बाजार भाव नऊशे ते एक हजारापेक्षा कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी सबएजंट संस्थेकडून स्थापन केलेल्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. सध्या कोव्हिड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. 

‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर होणार नोंदणी
सद्यस्थितीत सबएजंट संस्थाकडे असलेले अपुरे तांत्रिक व सक्षम मनुष्यबळ तसेच पुरेसे संगणक, स्कॅनर, आदिंची अनुपलब्धता विचारात घेता शेतकऱ्याच्या शेतमालाची नोंदणी गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या ‘आपले सरकार’ सेवाकेंद्राद्वारे झाल्यास गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यास निश्चितच मदत होणार आहे व शेतकऱ्यांनाही ते सोइचे ठरणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील गाव पातळीवर उपलब्ध असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास सुरक्षीत अंतराचे पालन करुन नोंदणी करणेसाठी परवानगी दिलेली आहे. 

नऊ ठिकाणी होणार नोंदणी
नांदेड जिल्ह्यात सध्या प्रायोगिक तत्वावर देगलूर तालुक्यातील गवंडगाव बिलोली तालुक्यातील कासराळी, हदगाव तालुक्यातील मनाठा, निवघा, तळणी व तामसा किनवट तालुक्यातील दिगडी (एम), कोठारी (चि.), मांडवा (कि.) मांडवी व सारखनी येथील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर नोंदणीची कार्यवाही सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणी येत्या दोन - तीन दिवसात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नोंदणी सुरू केली जाणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर नोंदणीसाठी येताना त्यांचे आधार ओळखपत्र, पीक पेऱ्याची ऑनलाइन नोंद असलेला गाव नमुना क्र. ७/१२ च उतारा, वैयक्तिक संगणकीकृत पेरा प्रमाणपत्र, आधार क्रमांकाशी जोडणी घेऊन यावा. 

गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी
शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सतेच गावातील ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रावर कमीतकमी गर्दी होइल यासाठी संबंधित गावातील पोलिस पाटील, सरपंच, सेवा सहकारी संसथेचे अध्यक्ष इ. यंत्रणेने त्यांचे स्तरवरून आवश्यक ते सहकार्य करावे. नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांनी एकदम गर्दी होणार नाही या दृष्टीने घटकांशी समन्वय ठेवून आपले स्तरावर नियोजन व अंमल करावा. तेव्हा शेतकऱ्यांना आाहन करण्यात येते की, त्यांनी गावपातळीवर असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र येथे जाऊन चना शेतमालाची नोंदणी करुन घ्यावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com